
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषदेत रक्तदान शिबिराचे आयोजन
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषदेत रक्तदान शिबिराचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) – भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या युद्धसदृश परिस्थितीत भारतीय सैन्याला संभाव्य रक्ताचा तुटवडा भासू शकतो, ही बाब लक्षात घेऊन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाहनानुसार शुक्रवार, ९ मे रोजी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, शिक्षण अधिकारी विकास पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगवडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी हेमंत भदाणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, “देशात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर सैन्य दलासाठी रक्तसाठा आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे.”
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, अधिकाधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सदर शिबिर रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीमार्फत आयोजित करण्यात आले होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम