
मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांची रविकांत तुपकर यांना नोटीस..!
कितीही दबाव आणला तरी आंदोलन करणारच; तुपकरांची ठाम भूमिका...!
मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांची रविकांत तुपकर यांना नोटीस..!
कितीही दबाव आणला तरी आंदोलन करणारच; तुपकरांची ठाम भूमिका…!
बुलढाणा, प्रतिनिधी : –शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाहीर केलेल्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना आज 16 मार्च रोजी नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता आंदोलन करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे या नोटीस मध्ये नमूद आहे. दरम्यान अशा नोटिसेसला घाबरत नाही, काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणारच अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली आहे.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, पिकविमा, सोयाबीनचा -कापसाचा भावफरक यासह सोयाबीन- कापूस, ऊस, कांदा, धान, दूध उत्पादकाना मदत व भाववाढ आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी 19 मार्च रॊजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्रात सातबारे बुडवून कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहेत तसेच सोयाबीन कापूस बुडवून शासनाचे लक्ष वेधणार आहेत. या आंदोलनात सहभागी होऊन स्वतःला कर्जमुक्त करण्यासाठी गावागावातील शेतकरी मुंबईला जाण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. 18 मार्च रोजी सकाळी 9 वाजता बुलडाणा शहरातील क्रांतिकारी हेल्पलाइन सेंटर वरून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी मुंबईकडे आगेकूच करणार आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना कलम 168 नुसार नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच इतरांच्या जीवितवस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आंदोलन करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे नोटीसमध्ये नमूद आहे. तर दुसरीकडे रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. अशा नोटिसेसने आपल्या घरातील कपाट भरलेले आहे, या नोटीसला आम्ही घाबरत नाही असे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. आमचे आंदोलन दडपण्याचा आणि शेतकरी चळवळ बंद पाडण्याचा हा शासनाचा आणि प्रशासनाचा डाव आहे, परंतु आम्ही डगमगणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करणारच अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेड मध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, ऊसाला एकरकमी एफआरपी द्यावी यासह कांदा, दूध, धान व इतर उत्पादनाना अनुदान ज्यावेळेस इतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत. या आंदोलनात कुठेही हिंसा होणार नाही, कायदा हातात घेतला जाणार नाही आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत, तरीही पोलिसांनी नोटीस देऊन आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. अशा कितीही नोटीस दिल्या तरी आम्ही आंदोलन करणारच असे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. 18 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता बुलढाणा येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाइन सेंटर समोर सगळे शेतकरी एकत्र जमणार आहेत व तेथून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबईकडे आगेकूच करणार आहेत. रात्री मुंबईच्या वेशीवर मुक्काम करून 19 मार्च रोजी सकाळी रविकांत तूपकरांचे नेतृत्वात सगळे शेतकरी नरिमन पॉईंट येथे अरबी समुद्रावर पोहोचणार आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा हक्क मागण्यासाठी जात आहोत त्यामुळे पोलिसांनी उगीच आडवा – आडवी करू नये, आम्हाला मुंबईत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम