
समाजातील सर्वच घटकांनी एकत्र असावे : कराळे
केशव स्मृती सेवा समूहातर्फे पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांचा सत्कार
समाजातील सर्वच घटकांनी एकत्र असावे : कराळे
केशव स्मृती सेवा समूहातर्फे पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांचा सत्कार
जळगाव प्रतिनिधी
आपण सर्वच समाजाचे घटक आहोत. प्रत्येक व्यक्ती समाजाचे देणे लागतो. सामाजिकजबाबदारी म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांनी येथे केले. शहरातील नवी पेठेतील जळगाव जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात केशव स्मृती सेवा समूहातर्फे त्यांचा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला, या वेळी ते बोलत होते.
नाशिक विभागाचे विशेष पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी नुकताच राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला.
शहरातील नवी पेठ येथील जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शाल, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन त्यांना या वेळी गौरविण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर केशवस्मृती सेवा समूहाचे प्रमुख डॉ. भरतदादा अमळकर, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने उपस्थित होते. हा सत्कार सुखद पुढे बोलताना कराळे म्हणाले की, जनता बँकेतर्फे करण्यात आलेला सत्कार हा सुखद धक्का देणारा आहे. अशा प्रकारच्या सत्काराची अपेक्षा नव्हती. जळगावात सेवेत असताना स्व. अविनाश आचार्य यांच्या कार्याबद्दल बरेच काही ऐकले आहे. त्यांच्याबद्दल विशेषतः मुस्लीम महिला आणि बांधवांमध्येही आदराची भावना होती. अशा व्यक्तिमत्त्वाला सलाम आणि त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेतर्फे आज सत्कार होतोय याचा विशेष आनंद आहे.
सांस्कृतिक उपक्रम एकत्र होतात तेथे शांतता पुढे बोलताना कराळे म्हणाले, मी कवी, खेळाडूवृत्तीचा आहे. मी समाजात सहज मिसळतो, अशा उपक्रमात सहभागी होतो. काही जण याचं कौतुक करतात, तर काही वेळा टीका होते. पोलिसांचे हे काम आहे का? असेही बोलले जाते. पण अशा लोकांना माझं स्पष्ट सांगणं आहे, ज्या समाजात क्रीडा, साहित्य, कला, आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्या ठिकाणी शांतता कायम राहते. यामुळे आमच्या खात्याचं काम कमी होतं. माझ्या मते हे उपक्रम अनपेक्षित घटना रोखण्यासाठीचे लसीकरण आहे. त्यामुळे सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी असे केले पाहिजे. शासन, प्रशासन आणि नागरिक आपण सर्व एक आहोत. आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे म्हणत त्यांनी केशवस्मृती सेवा संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
संस्कार रुजविणारी संस्था तर केशवस्मृती संस्थेचे उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड यांनी आपल्या मनोगतात, जो व्यक्ती कीर्तीच्या मागे पळतो, त्याच्यापासून कीर्ती लांब पळते. काही माणसं कीर्तीपासून लांब पळतात, अशा माणसांच्या मागे अस्पष्टपणे सावलीसारखी कीर्ती मागे मागे जात असते. माणूस हा त्याच्या कर्तृत्वाने चमकतो, असे म्हणत दत्तात्रत कराळे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. केशवस्मृती सेवा संस्थेविषयी बोलताना आमची संस्था समाजात बदल घडविते असे म्हणत, संस्थेच्या विवेकानंद शाळेचे उदाहरण देत आमची शाळा संस्कार रुजविते, असे गायकवाड यांनी नमूद केले.
वर्दीतील सहृदय माणूस कराळे -डॉ. भरतदादा अमळकर दरम्यान, केशवस्मृती सेवा समूहाचे प्रमुख डॉ. भरतदादा अमळकर म्हणाले, आम्ही सन 2009 ला
अखिल भारतील अधिवेशन घेतले. या कार्यक्रमाला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आले होते आणि त्यांचा परिचय आणि प्रस्तावना करण्याची संधी मला मिळाली होती. त्यांच्या परिचयात मी असं म्हटलं होतं की, “आज मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, ते पुढे देशाचे पंतप्रधान होतील आणि जगाचे नेतृत्व करतील.” तेव्हा मी असं का बोललो माहीत नाही पण… तसंच घडलं. असाच प्रकार एकदा झाला. आपण दरवर्षी अविनाशजी आचार्य पुरस्कार देतो. आपण बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला पुरस्कार वितरणासाठी बोलावतो. पण, या पुरस्कार वितरणाला आपण त्या वेळचे पोलीस
अधीक्षक दत्ताजी कराळे यांना बोलावू असं ठरलं. यावर एकाने विचारलं की, सामान्यतः आपण पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी अशा स्थानिक लोकांना बोलवत नाही. पण, मी म्हणालो, “ते उद्या मोठे होणारच आहेत आणि ते त्यांच्या कर्तृवाने सिद्ध झाले.” हा साक्षात अनुभव आहे. छोट्या गोष्टीतून
योग्य कल्पकतेने काम केले तर माणूस कसा मोठा होतो याचे कराळे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांचं सावरकरांविषयीचं प्रेम, कवितेविषयीचं प्रेम, माणसांना जोडून ठेवण्याविषयीचं प्रेम हा त्यांच्यातील मोठा गुण असल्याचे भरतदादा अमळकर म्हणाले. कवितेस मिळाली दाद
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्पप्रमुख अनिल भोकरे यांनी केले. तर मानपत्र वाचन किरण सोहळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप लाड यांनी केले. कार्यक्रमास केशवस्मृती सेवा संस्था समूह, जळगाव जनता सहकारी बँक संचालक व समूहातील मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती. या प्रसंगी कराळे यांनी स्वरचित कविता वाचून दाखविली. कवितेस उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम