अडावदमध्ये विजेच्या झुलत्या तारांचा गंभीर धोका; महावितरणचे दुर्लक्ष कायम
तारका नगरमधील रहिवासी धास्तावले; जबाबदार कोण?
अडावद ता. चोपडा प्रतिनिधी l : अडावद गावातील तारका नगर परिसरात विजेच्या लोळणाऱ्या तारांमुळे मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विजेच्या तार जमिनीपासून अवघ्या ७ ते ८ फूट उंचीवर असून, त्या सहज कोणालाही स्पर्श होण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे याबाबत महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
तारका नगर भागात राहणाऱ्या नागरिकांनी वारंवार महावितरणच्या आडावद सबस्टेशनला फोन करून आणि लेखी तक्रारी देऊन ही समस्या मांडली. मात्र, प्रत्येक वेळी ‘पाहतो’, ‘सांगतो’, ‘तपासतो’ अशा उडवाउडवीच्या उत्तरांपलीकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सामान्य जनतेच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दैनंदिन जीवन धोक्यात
या झुलत्या तारांखाली लहान मुले खेळत असून, शाळेच्या वेळेस विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. घरगुती वापरासाठी पाणी आणणे, बाजारहाट करणे यासाठी नागरिकांना त्या भागातूनच जावे लागते. त्यामुळे एखादा जीवघेणा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महावितरणच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाला प्रश्न : जबाबदार कोण?
सततच्या तक्रारी असूनही महावितरण कंपनीकडून काहीही हालचाल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. उद्या जर एखादा अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण, असा थेट सवाल आता ग्रामस्थ करत आहेत.
नागरिकांचा इशारा
जर लवकरात लवकर या झुलत्या तारांची दुरुस्ती करून सुरक्षित उंचीवर नेण्यात आले नाही, तर ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
बातमी शेअर करा...
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा