अमृत भारत योजनेतून रेल्वे स्थानकांचा कायापालट

बातमी शेअर करा...

अमृत भारत योजनेतून रेल्वे स्थानकांचा कायापालट

प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांचा वर्षाव; भुसावळ विभागात वेगाने कामे पूर्णत्वाकडे
भुसावळ : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत असून प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विभागातील विविध स्थानकांवर ४७ लिफ्ट आणि २१ एस्कलेटर उभारण्यात आले असून बहुतांश कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि दिव्यांग प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे.
प्रज्ञाचक्षु व दिव्यांगांसाठी विशेष सुविधा
महत्त्वाच्या स्थानकांवर ब्रेल लिपीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कूलर, हायमास्ट दिव्यांमुळे अधिक प्रकाशव्यवस्था आणि मोबाईल चार्जिंग पॉइंट्सची सुविधाही वाढविण्यात आली आहे.

प्रमुख स्थानकांवरील कामे पूर्णत्वाकडे
देवळाली, लासलगाव, धुळे, सावदा आणि मूर्तिजापूर येथील कामे पूर्ण झाली असून रावेर स्थानकावरील काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित सुविधांचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नाशिक रोड स्थानकावर आधुनिक बदल
नाशिक रोड स्थानकावर शौचालयांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. कोच मार्गदर्शन प्रणालीमुळे प्रवाशांना आपला डबा नेमका कुठे येईल, याची अचूक माहिती मिळत आहे. याशिवाय डिजिटल डिस्प्ले बोर्ड आणि व्हिडिओ स्क्रीनद्वारे गाड्यांची वेळ व इतर माहिती सहज उपलब्ध होत आहे.
नवीन गाड्यांमुळे कनेक्टिव्हिटीत वाढ
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून १० नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये हायस्पीड वंदे भारत तसेच अमृत भारत एक्सप्रेसचा समावेश असून भुसावळहून मुंबई, पुणे आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

“प्रवाशांचे समाधान आणि सुरक्षा हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अमृत भारत योजनेमुळे स्थानकांवर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे.”
— बी. बी. तपस्वी, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे प्रशासन

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम