
अमृत योजनेच्या पाईपांना भीषण आग
अमृत योजनेच्या पाईपांना भीषण आग
रावेरमध्ये ४० लाखांचे नुकसान; आठ फेऱ्यांनंतर आग आटोक्यात
रावेर (प्रतिनिधी) : शहरात सुरू असलेल्या ‘अमृत योजना’ अंतर्गत साठवून ठेवलेल्या पीव्हीसी व लोखंडी पाईपांना सोमवारी (दि. २ मार्च) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणावर पाईप जळून खाक झाले असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
छोरिया मार्केटलगतच्या मोकळ्या जागेत अमृत योजनेसाठी लागणारे पीव्हीसी व लोखंडी पाईप उतरवून ठेवण्यात आले होते. दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच रावेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तब्बल आठ फेऱ्या मारून पाण्याचा मारा केला. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, भास्कर महाजन, नगरसेवक राजेश शिंदे, भूषण महाजन, दीपक महाजन तसेच पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. योजनेचे कंत्राटदार इंद्रा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम