आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन

बातमी शेअर करा...

आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) : खान्देशातील भूमीतून विविध क्षेत्रातील प्रतिभावंत निर्माण झाले आहेत त्यांना प्रेरणा मानून युवारंगाद्वारे प्राप्त झालेल्या संधीच सोनं विद्यार्थ्यांनी करावं असे प्रतिपादन करून आजच्या तरूणपिढीने राष्ट्र सर्वप्रथम ही भूमिका अंगीकारावी व आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान देशाप्रती समर्पित करावे असे आवाहन करीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरींग व मॅनेजमेंट (स्वायत्त), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन करतांना राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी, विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन, प्र. कुलगुरू प्रा. एस. टी इंगळे, स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, युवारंग चे कार्याध्यक्ष नितीन झाल्टे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अॅड अमोल पाटील, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. पवित्रा पाटील, प्रा. महेंद्रसिंग रघुवंशी, प्रा. एस.एस. राजपूत, प्रा. जगदीश पाटील, प्रा. सुरेखा पालवे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, संचालिका डॉ.प्रिती अग्रवाल, वित्त व लेखाध‍िकारी सीए रवींद्र पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, स्वप्नाली महाजन, प्रा. संदीप नेरकर, प्रा. मंदा गावीत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे व डॉ. संजय शेखावत, डॉ. संजय पाटील, डॉ. विवेकानंद चव्हाण (जिल्हा समन्वयक) आणि सर्व माजी विद्यार्थी विकास संचालक उपस्थित होते.

ना. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, खान्देशाच्या भूमीतून भास्काराचार्य, साने गुरूजी, शिरीष कुमार, बालकवी ठोंबरे, लता मंगेशकर, भालचंद्र नेमाडे, अभिनेत्री स्मिता पाटील, कवि ना.धो. महानोर, प्रतिभाताई पाटील, उद्योजक भंवरलाल जैन, शितल महाजन इ. त्या त्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी आपली क्षमता सिध्द करून खान्देशाला नावलौकीक प्राप्त करून दिला आहे. या व्यक्तींच्या कार्याची प्रेरणा घेवून विद्यार्थ्यांनी नावलौकीक मिळवावा. आजच्या तरूणाईने व्यसनाधिनतेला स्पष्टपणे नकार देवून उत्कृष्ट सुसंस्कारीत नागरीक प्राप्त झालेल्या शिक्षणाच्या आधारे बनावे. एका क्षेत्रात सातत्य ठेवून त्यामध्ये सर्वोच्चस्थानी पोहचण्याचा प्रयत्न करावा. मनामध्ये आत्मविश्वास ठेवावा. ज्ञान देशासाठी अर्पण करावे. प्रधानमंत्री मोदी व राज्याचे मुख्यमंत्री यांनी विविध योजना युवकांसाठी जाहीर केल्या आहेत त्याचा फायदा घ्यावा. आरोग्यम धनसंपदा या ब्रीदवाक्याला शिर्षक म्हणून समोर ठेवून व्यसनाधिनता ठेवू नये व राष्ट्राचे शिक्षीत व सुसंस्कृत नागरीक बनावे. या युवारंगाला २५ वर्षांची परंपरा आहे. त्यातून उत्कृष्ट कलावंत निर्माण झाले आहेत. विद्यापीठाने ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सुसंस्कृत नागरीक बनविले आहे. ते त्या त्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. त्याचे श्रेय विद्यापीठाचे कुलगुरू व सर्व संबंधित घटकांचे आहे. या युवारंगात “वंदे मातरम १५०” संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. वंदे मातरम या गीतातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीला दिशा देणाऱ्या क्रांतीची ज्वाला पेटविली गेली आणि राष्ट्रभक्तीच्या चेतनेला आकार मिळाला आहेृ. विद्यार्थ्यांनी या युवारंगाच्या संधीचा लाभ घेवून उत्कृष्ट कलावंत व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठाला आपतकालीन मदत केंद्र व इतर समस्या सोडविण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करण्याचे आश्वासन दिले आणि या युवारंगात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिंनींचा सहभाग लक्षणीय आहे. विद्यार्थ्यांनी देखील स्वयंशिस्त बाळगत आपला सहभाग वाढवावा असे आवाहन करीत उद्घाटनाचे जल्लोषपूर्ण भाषण केले.

स्वागताध्यक्ष राजू नन्नवरे यांनी विद्यापीठाच्या युवारंगाला थीम बेस करण्याचे गेल्या तीन वर्षापासून सुरु केले आहेत. राज्यात हा प्रयोग प्रथम आपल्या विद्यापीठाने सुरु केला त्याचे अनुकरण आता इतर विद्यापीठे करीत आहेत असे सांगून पहिल्या युवारंगात शिवराज्यभिषेक, दुसऱ्या युवारंगात अहिल्यादेवी होळकर आणि आता बकीमचंद्र चटोपाध्याय लिखीत वंदे मातरम या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने ही थीम देण्यात आली आहे. विद्यापीठाने चांगला नावलौकीक व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिलेल्या योगदानामुळे एनआयआरएफ रँकींगमध्ये आपले ५१ते १०० मधील स्थान कायम ठेवले आहे.

कार्याध्यक्ष नितीन झाल्टे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, युवारंग ही एक स्पर्धा आहे यात तुमचा सहभाग महत्वाचा आहे. जिंकणे किंवा हारणे हे महत्वाचे नाही. जीवनात आपल्याला अनेक स्पर्धांना सामोरे जावे लागेल.

अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी ‘कैसे कहू की मुलाकात नही होती, रोज मिलते है पर बात नही होती’ हा शेर ऐकवित विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. पुढे त्यांनी सांगितले की, वंदे मातरम या राष्ट्रगीतातून राष्ट्राचे ऐक्य, धैर्य, शौर्य, अस्मिता, अभिमानाचे प्रतिक व अखंडता स्पष्ट होते. २०४७ मध्ये भारत एक विकसित, शक्तीशाली,आधुनिक, सामर्थ्यपूर्ण व आत्मनिर्भर देश म्हणून दिसेल. आपले काम प्रामाणिकपणे करून ते राष्ट्र प्रथम म्हणून राहू द्यावे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाद्वारे उच्च शिक्षीत झाल्यानंतर अस्तित्व टिकवण्यासाठी गुंतागुंत घालवण्याचे कौशल्य, समिक्षात्मक विचार करणे व भावन‍िक बुध्दीमत्ता हे तीन गुण नित्य जपावे. पॅश‍िनेट रहाव, सहानुभूती व सामाजिक बांधिलकी नेहमी जपावी असे सांगितले.

प्रारंभी विद्यार्थी विकास संचालक डॉ. लेकूरवाळे यांनी सहभागी कलावंतामध्ये ४० टक्के विद्यार्थी तर ६० टक्के विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग आहे. यंदाच्या रौप्यमहोत्सवी युवारंग असल्याचे सांगितले.

आयोजक महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. प्रिती अग्रवाल यांनी युवारंग युवक महोत्सव रायसोनी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणं ही इतिहासात नोंद घेणारी ही घटना आहे. या युवारंगात मेक इन इंडियाचा या महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला लोगोची प्रतिकृती तयार केली असल्याचे सांगितले तसेच युवारंगाचे दुसरे वैशिष्टय नमूद करतांना त्यांनी एआय-युवा-किंबा हा कृत्रिम बुध्दीमत्तेवर अधारीत सहायक तयार केला असून या पाच दिवसात या युवा-किंबाला कोणताही प्रश्न विचारला तर तो युवारंगाची माहिती देईल. या युवारंगात महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व २५० स्वयंसेवक विद्यार्थी मेहनत घेत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीस विद्यापीठ ध्वजाचे आरोहण कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, युवारंग ध्वजाचे आरोहण डॉ. जयेंद्र लेकुरवाळे आणि रायसोनी महाविद्यालयाच्या ध्वजाचे आरोहण डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्यगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर युवारंग गीत झाले. सुमीत खैरे या विद्यार्थ्याने प्रतिज्ञा दिली. युवा-किंबाचे उद्घाटन मंचावरील मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या समारंभात विद्यापीठाचे माजी विद्यार्थी संचालक प्रा. केशव ढाकणे, प्रा. शांताराम बडगुजर, प्रा. विलास चव्हाण, प्रा. पंकजकुमार नन्नवरे, प्रा. सत्यजित साळवे, प्रा. जी.ए. उस्मानी, प्रा. एस.टी. इंगळे, प्रा. सचिन नांद्रे व प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांचा सत्कार मंचावरील मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन हर्षल पाटील तर आभार समन्वयक प्रा. संजय शेखावत यांनी मानले. यावेळी अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा.एस.टी. भुकन, अधिसभा सदस्य ऋषीकेश चित्तम, डॉ. कविता महाजन, नेहा जोशी, वैशाली वराडे, व्ही.टी. जोशी, नितीन ठाकूर, दिपक पाटील, भानुदास येवलेकर, प्रा. गजानन पाटील, अॅङ केतन ढाके, केदारनाथ कवडीवाले आदि मान्यवर व सहभागी विद्यार्थी, व्यवस्थापक व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गिताने झाली हे गीत विवेकानंद प्रतिष्ठानच्या कलावंतांनी सादर केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम