
उतराखंडमधील अतिवृष्टीत अडकलेल्या जळगावच्या भाविकांच्या सुटकेसाठी पालकमंत्री पाटीलांचा दिल्लीमध्ये तळ
उतराखंडमधील अतिवृष्टीत अडकलेल्या जळगावच्या भाविकांच्या सुटकेसाठी पालकमंत्री पाटीलांचा दिल्लीमध्ये तळ
जळगाव,– उतराखंडमधील अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांना सुखरूप दिल्लीमार्गे परत आणण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेत तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
बैठकीस स्मिता शेलार, आशुतोष दिवेदी (सहाय्यक निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन) आणि प्रमोद कोलपते (व्यवस्थापक, महाराष्ट्र सदन) उपस्थित होते. राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून भाविकांच्या मदतीसाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालकमंत्री पाटील यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे खासगी सचिव हिमांशू यांच्याशी थेट संवाद साधून भाविकांना शक्य तितक्या लवकर दिल्लीपर्यंत आणण्याची विनंती केली. हिमांशू यांनी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले असून, लवकरात लवकर दिल्लीमार्गे सुटकेची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले. यावेळी उतराखंडचे पोलीस उपमहानिरीक्षक निलेश भरणे यांच्याशीही चर्चा झाली.
गुलाबराव पाटील हे कालपासून दिल्लीमध्येच थांबून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग, रेल्वे प्रशासन आणि अन्य यंत्रणांशी समन्वय साधत आहेत.
सध्या जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. धरणगाव) येथील 13 तरुण आणि जळगाव शहरातील एका कुटुंबातील 3 जण – अनामिका मेहरा, कन्या आरोही मेहरा आणि पती रुपेश मेहरा – उतराखंडमधील हर्षिलजवळील भगिरथी होमस्टे, बागोरी येथे अडकले आहेत.
हे सर्व भाविक सुरक्षित असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तराखंड प्रशासन आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनमार्फत त्यांची सुरक्षित सुटका करण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू असल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम