उमाळा घाटात भीषण अपघात; दुचाकी पुलावरून कोसळून दाम्पत्य ठार

बातमी शेअर करा...

उमाळा घाटात भीषण अपघात; दुचाकी पुलावरून कोसळून दाम्पत्य ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पिंप्राळा येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू

जळगाव : फर्दापूरनजिकच्या ठाणा गावातील लग्नसमारंभ आटोपून दुचाकीने जळगावकडे परतत असलेल्या दाम्पत्याचा उमाळा घाटातील पुलावर भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकी पुलावरून खाली कोसळल्याने मुझफ्फर अली सय्यद बबन (वय ६०) व ताहेराबी मुजफ्फर अली (वय ५५, दोघ रा. पिंप्राळा हुडको) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि. २५ मार्च रोजी दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास घडली.
मुझफ्फर अली सय्यद बबन हे शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात मसाला व्यवसाय करत होते. ते पत्नी ताहेराबी आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. बुधवारी ते आपल्या चुलत भावाच्या मुलीच्या लग्नासाठी (एमएच १९, ईजे ३८९८) या दुचाकीने ठाणा गावात गेले होते. समारंभ आटोपल्यानंतर ते जळगावकडे परतत असताना उमाळा ते गाडेगाव दरम्यानच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
धडकेचा वेग इतका प्रचंड होता की, दुचाकीसह दोघेही पुलावरून खाली फेकले गेले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. तत्काळ त्यांना खाजगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी रुग्णालय परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. अपघातप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम