
करंज येथील तलाठ्याला पाच हजाराची लाच घेतांना अटक
करंज येथील तलाठ्याला पाच हजाराची लाच घेतांना अटक
महसूल विभागात खळबळ; एसीबीची कारवाई
जळगाव : शेतजमिनीची खरेदी केल्यानंतर नाव नोंदणीसाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सजा करंज येथील तलाठी अजय बिडवे याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावाने शेतजमीन खरेदी केली होती. या जमिनीची अधिकृत नोंद सरकारी दप्तरी करण्यासाठी तलाठी अजय बिडवे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पडताळणी करून २७ फेब्रुवारी रोजी सापळा रचला. मात्र, तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने संबंधित तलाठ्याने त्यावेळी लाच स्वीकारली नाही.
तथापि, पडताळणीत लाच मागणी सिद्ध झाल्याने वरिष्ठांच्या अहवालानंतर गुरुवारी (दि. २६) जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व तलाठी अजय बिडवे याला अटक करण्यात आली.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलीस हवालदार संगीता पवार, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी व प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम