कापूस दरात अनपेक्षित वाढ; साठाधारकांना दिलासा

बातमी शेअर करा...

कापूस दरात अनपेक्षित वाढ; साठाधारकांना दिलासा

खासगी व्यापाऱ्यांकडून ७८०० ते ८२०० रुपये दराने खरेदी; शेतकऱ्यांना मर्यादित फायदा

जळगाव : जिल्ह्यात कापूस हंगाम जवळपास आटोपत असताना बाजारात कापसाच्या दरात अनपेक्षित वाढ झाली आहे.बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच कापूस विक्री केल्याने या दरवाढीचा लाभ मोजक्याच शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे चित्र आहे. सध्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) ची खरेदी बंद असतानाही खासगी व्यापारी प्रतिक्विंटल ७८०० ते ८२०० रुपये दराने कापूस खरेदी करत आहेत.

हमीभावापेक्षा जास्त दर
हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने बाजारात चांगली हालचाल दिसून येत आहे. कापूस गाठींच्या दरात झालेल्या वाढीमुळे साठा ठेवणाऱ्यांना मोठा फायदा होत असून बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

गुजरात राज्यातून खानदेशातील कापसाला मोठी मागणी येत आहे. स्थानिक जिनिंगपेक्षा गुजरातमध्ये अधिक दर मिळत असल्याने व्यापारी जिल्ह्यातील कापूस तेथे पाठवत आहेत. ज्यांच्याकडे अजून कापूस साठा आहे, अशा शेतकऱ्यांना या दरवाढीचा काहीसा दिलासा मिळत आहे.सध्या मोठ्या प्रमाणावर कापूस साठा कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडे असल्याने या दरवाढीचा सर्वाधिक आर्थिक फायदा सीसीआयलाच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कृत्रिम धाग्यांच्या दरवाढीचा परिणाम
आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे कृत्रिम धाग्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊन उद्योग नैसर्गिक कापसाकडे वळत आहेत. परिणामी कापसाच्या मागणीत वाढ झाली असून गाठींचे दरही वधारले आहेत.
गेल्या दोन वर्षांत प्रथमच कापसाचे दर ८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे बाजारात चैतन्य निर्माण झाले असले तरी प्रत्यक्ष फायदा साठाधारकांनाच अधिक होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम