
केबल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; तिघांना अटक
केबल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; तिघांना अटक
एमआयडीसी पोलिसांची कारवाई; शेतकऱ्यांचा मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) – शेतातील विहिरी व बोअरवेलवरील विजेच्या केबल्स चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश करत तिघा संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जळगाव तालुक्यातील लमानजन येथील शेतकरी नवल भटू गुंजाळ यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातून ३० मार्च २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी मोटारींच्या केबल वायरची चोरी केली होती. सुमारे १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गणेश वाघ व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे ३१ मार्च रोजी तीन संशयितांना ताब्यात घेतले. अनिल कर्तार भिल्ल (रा. नागदुली, ता. एरंडोल), संदीप सुभाष देवरे (रा. नागदुली, ता. एरंडोल) आणि आनंदा शांताराम कोळी (रा. वाकडी, ता. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ३० मीटर कॉपर वायर (किंमत ३ हजार रुपये) तसेच जाळून काढलेले तांबे (किंमत ५ हजार रुपये) असा एकूण ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम