खते उपलब्ध असूनही विक्री टाळणाऱ्या केंद्रांवर कारवाई; ३ परवाने रद्द, १२ निलंबित

बातमी शेअर करा...

खते उपलब्ध असूनही विक्री टाळणाऱ्या केंद्रांवर कारवाई; ३ परवाने रद्द, १२ निलंबित

जळगाव (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कृषी केंद्रांवर जिल्हा कृषी विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. रासायनिक खतांचा पुरेसा साठा असूनही कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करत तीन खत विक्री परवाने थेट रद्द करण्यात आले, तर १२ परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय सात विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

पावसाने दिलेल्या दमदार सुरुवतीनंतर खरीप हंगामाने वेग घेतला असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर खते खरेदीसाठी कृषी केंद्रांकडे गर्दी करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी खते गोदामात असतानाही विक्रेत्यांनी उपलब्ध नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना नकार दिल्याचे समोर आले.

या पार्श्वभूमीवर जिल्हा गुणवत्ता निरीक्षक विकास बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून तपासणी मोहीम राबवली. या तपासणीत जळगाव, चाळीसगाव, जामनेर, अमळनेर आणि भडगाव तालुक्यांतील अनेक केंद्रांमध्ये साठा असतानाही खते विक्री न करण्याचे प्रकार उघड झाले. तसेच दप्तर नोंदीतील गोंधळ आणि प्रत्यक्ष विक्रीत तफावतही आढळली.

तपासणीत अमळनेर तालुक्यातील सहा, जळगावमधील तीन, भडगावमधील दोन आणि चाळीसगाव तालुक्यातील एक कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर चाळीसगावमधील तीन केंद्रांचे परवाने थेट रद्द करण्यात आले आहेत.

या कारवाईबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी सांगितले की, “जिल्ह्यात रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तरीही जर कुणी शेतकऱ्यांना खते देण्यास नकार देत असेल, कृत्रिम टंचाई निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही.”

याआधी फेब्रुवारी महिन्यात देखील १८ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले होते. मात्र काही विक्रेते नफेखोरीतून बाहेर येण्यास तयार नसल्याने, अशा विक्रेत्यांविरोधात आणखी कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही श्री. बोरसे यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम