
खरीपपूर्व तयारीला वेग; कापूस बियाण्यांची मोठी मागणी
खरीपपूर्व तयारीला वेग; कापूस बियाण्यांची मोठी मागणी
जिल्ह्यात २२ लाख बियाणे पाकिटांची गरज; ७.३९ लाख हेक्टर पेरणीचा अंदाज
जळगाव (प्रतिनिधी):खरीप हंगामाला अजून साधारण दोन महिने शिल्लक असले तरी जिल्ह्यात कृषी विभागाच्या तयारीला वेग वेग आला आहे. येत्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाण्यांचे नियोजन तयार करण्यात आले असून, सुमारे ७ लाख ३९ हजार ७३६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बीटी कापसासाठी सुमारे २२ लाख बियाणे पाकिटांची मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली आहे.
४ लाख ४२ हजार हेक्टरवर कापूस लागवड
जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, मका व तूर ही प्रमुख पिके असून, यंदाही कापूस लागवडीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार सुमारे ४ लाख ४२ हजार हेक्टरवर कापूस लागवड होणार असून, त्यासाठी २१ लाख ८५ हजार ६६७ बीटी व २४ हजार ३३३ नॉन-बीटी अशा मिळून जवळपास २२ लाख १० हजार बियाणे पाकिटांची आवश्यकता भासणार आहे.
सोयाबीनकडे वाढता कल
मागील काही वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची चिन्हे दिसत असून, यंदा लागवड क्षेत्र ४७ हजार हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार सुमारे २४ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. यापैकी ६,२०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती आहे.
मक्याचे वाढते महत्त्व
कापसाला अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकरी मक्याकडे वळत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून मक्याखालील क्षेत्र वाढत असून, यंदा सुमारे १ लाख ७५ हजार हेक्टरवर मका लागवड प्रस्तावित आहे. यासाठी २६ हजार २५५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.
हवामानाचा परिणाम महत्त्वाचा
हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली असली, तरी शेतकरी दर्जेदार व सुधारित बियाण्यांना प्राधान्य देत आहेत. याच अनुषंगाने कृषी विभागाने नियोजन आखले असून, पुढील आठवड्यात आढावा बैठक घेण्यात येणार आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकरी सज्ज होत असून, पावसाच्या अनिश्चिततेतही उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम