
खान्देशातील लोककलेच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन
विद्यापीठात लोककला महोत्सवाला प्रारंभ
खान्देशातील लोककलेच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन
विद्यापीठात लोककला महोत्सवाला प्रारंभ
जळगाव( प्रतिनिधी)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग आणि कला-मानव्यविद्या प्रशाळेच्या वतीने आयोजित पहिल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सवात खान्देशातील ज्येष्ठ लोक कलावंतानी ताकदीने सादर केलेले पोवाडा, भवानी नृत्य, वीरनृत्य, किनरीवादन, आणि वहीगायन, यामुळे खान्देशातील लोककलेच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना झाले. दरम्यान उद्घाटनपर भाषणात सुप्रसिध्द लोककलावंत डॉ.गणेश चंदनशिवे यांनी लोककला अकादमीच्या स्थापनेसाठी विद्यापीठाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
यावर्षी पहिल्यांदाच विद्यापीठात लोककला महोत्सवाला प्रारंभ झाला. या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिध्द लोकलावंत व मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते झाले. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, व्यवस्थापन परीषद सदस्य तथा स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, महोत्सवाचे कार्याध्यक्ष नितीन झाल्टे, ॲड . अमाले पाटील, प्रा.शिवाजी पाटील,प्रा.पवित्रा पाटील, अधिष्ठाता प्राचार्य जगदीश पाटील, सिनेट सदस्य प्राचार्य एस.आर.पाटील, डॉ.ऋषीकेश चित्तम, विद्यार्थी विकास संचालक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे उपस्थित होते.
डॉ.गणेश चंदनशिवे आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापलीकडे पसरली आहे. लोककला या अंधश्रध्दा पसरवत नाहीत तर लोकशिक्षणाचे हे माध्यम आहे. संत शाहीर यांनी विज्ञानवादी दृष्टीकोनातून प्रबोधन केले आहे. खान्देशात लोककलेची समृध्द परंपरा असल्यामुळे या विद्यापीठाने लोककला अकादमी स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यातून तरुण पिढीला ही परंपरा समजेल त्यांनी यावेळी अण्णाभाऊ साठे यांची छक्कड सादर केली. कार्याध्यक्ष नितीन झाल्टे यांनी विद्यापीठात पहिल्यांदाच या प्रकारचा लोककला महोत्सव घेतला जात असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी कला हे भाषेप्रमाणेच अभिव्यक्तीचे माध्यम आहे आणि यातून व्यक्तीमत्वात परीपुर्णता येते असे सांगुन लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्या पार्श्वभुमीवर विद्यापीठाने लोककला महोत्सव घेऊन या कला जोपासण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी आयोजनामागील भूमिका सांगितली.
उद्घाटनाच्या सत्रानंतर ज्ञानेश्वर सोनवणे आणि सहकार्यांनी भवानी नृत्य, शाहीर भिका भाऊ यांनी किनरी वादन, शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकार्यांनी पोवाडा, शाहीर परशुराम सुर्यवंशी यांनी वीर नृत्य व गोंधळ सादर केला. तुषार थोरात यांनी वहीगायन सादर केले. या सर्व सुप्रसिध्द लोककलावंतानी कला सादर करुन विद्यार्थ्यांना या लोककलेचे महत्व सांगितले. सायंकाळच्या सत्रात सहभागी विद्यार्थ्यांनी लोककला सादर केल्या.
परिसंवाद
लोककलांची माहिती व्हावी यासाठी या महोत्सवात ‘खान्देशातील लोककला परंपरा’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य जगदीश पाटील होते. मंचावर शाहीर शिवाजीराव पाटील, विनोद ढगे, शाहीर परशुराम, तुषार थोरात, संतोष चौधरी व गोकुळ पाटील या लोककला अभ्यासकांनी सहभाग घेतला.
शाहीर शिवाजीराव पाटील यांनी खान्देशातील वहिगायन, शायरी, तमाशा पध्दती आदी विविध लोककलांची माहिती दिली. खान्देशातील लोककलांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले गेले आहे असे त्यांनी मत व्यक्त केले. विनोद ढगे यांनी शाहीरी या लोककलेला शिवकाळात सन्मान मिळाला असे सांगितले. शाहीर सीताराम मुचाटे यांनी पोवाड्याच्या माध्यमातून इंग्रजाविरुध्द लढा देण्यासाठी जनजागृती केली याबद्दलची माहिती दिली. शाहीर परशुराम यांनी गोंधळ, वीरनृत्य, डहाका, या संदर्भात विवेचन करुन वीर नृत्य संदर्भात सविस्तर माहिती दिली. तुषार थोरात यांनी पोतराज या लोककलेची माहिती देऊन व देवीचे गीत गादफन पोतराज हा आपला उदरनिर्वाह करीत असे सांगुन खान्देशी पोतराज डफावर गायन करुन समाजाला विविध माहिती देत असे असे सांगितले. संतोष चौधरी यांनी खान्देशातील प्रमुख लोककला वहिगायनाची निर्मिती मौखिक साहित्यातून निर्माण झाली त्यातून ही लोककला निर्माण होऊन त्याचे वेगवेगळे फड त्यावेळी होते. विविध धार्मिक, वार्षिक कार्यक्रमामधुन व कानबाई उत्सवात आवर्जून वहीगायनाचे कार्यक्रम होत असल्याचे कथन केले. गोकुळ पाटील यांनी वहिगायनातील जुन्या कलावंताने ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील गाण्याची चाल दिल्याचे सांगितले. लोककलाच्या माध्यमातून समाजाला वेगळी प्रेरणा मिळते असे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.जगदीश पाटील यांनी लोककलांच्या माध्यमातून लोककलावंतानी एकात्मतेची भावना रुजवत भारतातील एकात्मतेचे दर्शन घडवले असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान उद्या बुधवार दि. ५ मार्च रोजी सकाळच्या सत्रात शाहीर विनोद ढगे यांचे सादरीकरण तसेच मुक्त चर्चा होईल. त्यानंतर या महोत्सवाचा समारोप होणार आहे. या महोत्सवात २५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम