
गिरणा नदीत गणेश विसर्जनादरम्यान तरुणाचा बुडून मृत्यू
जळगाव: गणेश विसर्जनाच्या आनंदावर जळगावमधील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ममुराबाद येथील गणेश गंगाराम कोळी (वय २७) या तरुणाचा पाळधी-तरसोद दरम्यान नव्याने बांधलेल्या गिरणा नदीच्या पुलाखाली गणेश विसर्जन करताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाल
गणेश कोळी आपल्या आई-वडिलांसह आणि बहिणीसोबत घरगुती गणपती विसर्जनासाठी गिरणा नदीवर गेला होता. शनिवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ६ वाजता मूर्ती विसर्जनासाठी तो नदीत उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याच्या कुटुंबियांनी आरडाओरड करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे त्याला वाचवता आले नाही
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र आणि तालुका पोलिसांनी तात्काळ शोधकार्य सुरू केले. मात्र, गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे शोधकार्यात अनेक अडथळे आले. रविवारी (७ सप्टेंबर) सकाळपासून पुन्हा त्याचा शोध सुरू करण्यात आला असून, आव्हाणे, खेडी, वदनगरी, फुपनगरी आणि कानळदा गावाजवळ नदीकाठावर शोध घेतला जात आहे.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून, ९७६८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे ममुराबाद गावावर शोककळा पसरली असून, गणेशच्या अकाली निधनाने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम