
गिरणा नदीत पाय घसरून तरुणाचा मृत्यू
गिरणा नदीत पाय घसरून तरुणाचा मृत्यू
अनधिकृत वाळू उपशामुळे तयार झालेल्या खोल डोहांचा बळी; आव्हाणे परिसरात संताप
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथील संजय मणिलाल पाटील (वय ४५) यांचा गिरणा नदीपात्रात पाय घसरून बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ३) दुपारी दीड वाजता घडली. अनधिकृत वाळू उपशामुळे नदीपात्रात तयार झालेल्या खोल डोहांचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे येथील संजय पाटील हे मिस्तरीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी धरणगाव तालुक्यातील एका गावात काम आटोपल्यानंतर ते पायी आपल्या गावी परतत होते. दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास ते गिरणा नदीपात्रातून जात असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात पडून बुडाले.
नदीकाठी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी धाव घेत संजय पाटील यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, आव्हाणे परिसरात गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या बेकायदेशीर उत्खननामुळे नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी खोल आणि धोकादायक डोह निर्माण झाले असून त्याच डोहाचा अंदाज न आल्याने संजय पाटील यांचा बळी गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
संजय पाटील यांच्या पश्चात पत्नी, १० वर्षांचा मुलगा आणि वडील असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे आव्हाणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम