
गिरणा फीडर कालव्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; शासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
गिरणा फीडर कालव्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; शासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
एका महिन्यात कालवा सुरू करण्याची हमी; पारोळा तालुक्यातील बाहुटे येथे पाण्यात उतरून शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन
पारोळा : गिरणा फीडर कालवा पुन्हा सुरू करून परिसरातील धरणे भरण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने पारोळा तालुक्यातील बाहुटे परिसरात छेडण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. शासनाकडून एका महिन्याच्या आत कालवा सुरू करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या पंधरा वर्षांपासून कनेरे, तूराटखेडे, मराठखेडे, सावखेडे आणि भालगाव परिसरातील धरणे भरण्यासाठी आवश्यक असलेला गिरणा फीडर कालवा बंद अवस्थेत असल्याने या भागातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. कालव्यातून पाणी उपलब्ध झाल्यास शेतीला मोठा दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. या मागणीसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले.
या प्रश्नासंदर्भात ४ फेब्रुवारीपासून जिल्हा व तालुका स्तरावरील विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात येत होत्या. मात्र कालवा सुरू करण्याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने अखेर संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. सकाळी सुमारे दहा वाजता संघटनेचे पदाधिकारी, लाभार्थी शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने गिरणा कालव्यात उतरले आणि पाण्यात बसून बेमुदत आंदोलनास सुरुवात केली. आंदोलनादरम्यान प्रशासनाकडून आंदोलकांशी चर्चा सुरू करण्यात आली.
दरम्यान, जिल्हा अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन यांनी त्यांच्या पथकासह आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र शेतकऱ्यांनी शासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची ठाम भूमिका घेतली. अखेर दुपारी सुमारे दोन वाजून दहा मिनिटांनी लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता चंद्रकांत धनगर यांनी शासनाच्या वतीने पत्र देत एका महिन्याच्या आत संबंधित फीडर कालवा सुरू करण्यात येईल, अशी लेखी हमी दिली.
या लेखी आश्वासनानंतर शेतकरी नेते सुनील देवरे यांनी आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. मात्र दिलेल्या मुदतीत कालवा सुरू झाला नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारोळा पोलिस ठाण्याकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या आंदोलनात महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. विनोद चौधरी, कार्याध्यक्ष गुलाब पाटील, जलसंधारण समितीचे तालुकाध्यक्ष एस. झेड. पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन हाटकर, पारोळा सचिव नितीन पाटील, तालुका युवा अध्यक्ष निरंजन पाटील, शाखाप्रमुख समाधान पाटील, शुभम पाटील, सागर पाटील, सुखदेव पाटील, पंढरीनाथ खैरनार, गणेश पाटील, विकास पाटील, चतुर पाटील, रवींद्र पाटील, आबा पाटील, मुकेश पाटील, प्रवीण पाटील, धनंजय पाटील यांच्यासह भालगावचे सरपंच गोविंदा पाटील, भिका पाटील, कैलास पाटील, प्रेमराज पाटील, आनंदराव पाटील, चंद्रकांत पाटील आणि परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तुराटखेडे, सावखेडे व भालगाव परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांचीही आंदोलनस्थळी मोठी उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम