
घराच्या वाटणीवरून तरुणाचा खून
दोघांना अटक ; बाळद खुर्द येथील घटनेने खळबळ
भडगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घराच्या वाटणीवरून झालेल्या वादातून वडिलांनीच आपल्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकारात भावाचाही सहभाग असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
ही घटना ८ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास घडली. मृत बाळू राजेंद्र शिंदे (वय २६) याने घराच्या वाटपात अधिक हिस्सा मागितला होता. यामुळे वडील राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४८) व भाऊ भारत शिंदे (वय २२) यांच्यासोबत वाद झाला. वाद इतका उग्र झाला की, पित्याने आणि भावाने बाळूवर लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यामध्ये बाळूच्या चेहऱ्यावर व छातीवर गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी बाळद खुर्द गावचे पोलीस पाटील सुनिल लोटन पाटील (वय ५४) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राजेंद्र शिंदे व भारत शिंदे यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के व पोलीस नाईक महेंद्र चव्हाण करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम