जगण्यासाठी माणसाकडे तार्किक दृष्टिकोन असावा – प्रा. संतोष सुरडकर 

बातमी शेअर करा...

जगण्यासाठी माणसाकडे तार्किक दृष्टिकोन असावा – प्रा. संतोष सुरडकर 

“क्रांती विचारांचे प्रज्ञाविचारातील संक्रमण आणि विद्यमान फलश्रुती” व्याख्यानात प्रतिपादन
प्रतिनिधी I जळगाव
माणूस म्हणून जगण्यासाठी तार्किक दृष्टिकोन आवश्यक असून इतिहास डोळसपणे   समजून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्रा. संतोष सुरडकर यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त “क्रांती विचारांचे प्रज्ञाविचारातील संक्रमण आणि विद्यमान फलश्रुती” या विषयावरत्यांच्या व्याख्यानाचे आयोजन अधिसभागृहात ११ एप्रिल रोजी करण्यात आले होते.

यावेळी मंचावर उद्घाटन सत्राचे अध्यक्ष प्र- कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या प्रा. पवित्रा पाटील, विचारधारा व भाषा प्रशाळेचे संचालक प्रा. म. सु. पगारे, सह समन्वयक राजू सोनवणे उपस्थित होते.

प्रा. संतोष सुरडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, फुले यांचे तत्त्वज्ञान जातीव्यवस्था नष्ट करणे आणि पितृसत्ताक संस्कृती थांबवणे या दोन सूत्रांवर आधारित होते. त्यांनी शूद्र-अतिशूद्रांवरील अन्याय आणि स्त्रियांच्या स्थितीबाबत प्रभावी मांडणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० व्या शतकात जातीव्यवस्थेचा अभ्यास करून सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली शिक्षण मुक्तीगामी आणि समता, बंधुता व स्वातंत्र्याची जाणीव करून देणारे असावे, यावर त्यांनी भर दिला. समाजात राजकीय समानता असली तरी आर्थिक व सामाजिक समानता अद्याप पूर्णपणे साध्य झालेली नाही. आदिवासी, भटक्या-विमुक्त घटकांतील विद्यार्थ्यांना समान शिक्षण मिळणे आवश्यक आहे. संवैधानिक मूल्य समजून घेण्यासाठी फुले-आंबेडकरांचा विचार जाणून घेणे आणि विज्ञाननिष्ठ, चिकित्सक दृष्टीकोन स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी देश आणि समाजासाठी अभूतपूर्व कार्य करणाऱ्या महान व्यक्तींच्या विचारांची आजही समाजाला गरज असल्याचे सांगितले. महात्मा फुले यांनी मांडलेला समतेचा विचार केवळ सांगितला नाही, तर तो जीवनात प्रत्यक्ष अंगिकारला, असे त्यांनी नमूद करत महात्मा फुले यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार होणे आवश्यक असून त्यांच्या कार्यातून समाजाला दिशा मिळू शकते, असे सांगत राजेंद्र नन्नवरे यांनी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे म्हणाले की, भारतीय समाज जाती व वर्णव्यवस्थेत गुरफटलेला असताना ती वस्तुस्थिती समाजासमोर मांडण्याचे कार्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. १९ व्या व २० व्या शतकात पाश्चिमात्य देशांत झालेले सामाजिक बदल भारतात घडले नाहीत. त्यामुळे फुले-आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात अमलात आणल्याशिवाय देशातील लोकशाही बळकट होऊ शकत नाही, फुले यांनी शेतकरी व महिलांच्या प्रश्नांची ठामपणे मांडणी करून समाजप्रबोधनाचे कार्य केल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

पोस्टर , चित्रकला , वकृत्व आणि काव्यवाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले . यात महात्मा फुले ते बाबासाहेब आंबेडकर – सामाजिक क्रांतीचा प्रवास, स्त्री शिक्षण : फुलेंची क्रांती, आंबेडकरांची दिशा, महात्मा फुलेंच्या चळवळीची दोनशे वर्ष, भारतीय संविधानाचे शिल्पकार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डिजीटल युगात समतेचा संघर्ष, महापुरुषांचे विचार आणि आजचा युवक या विषयांचा समावेश होता विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद पहायला मिळाला. प्रास्ताविक प्रा. अनिल डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन खेमराज पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. म सु पगारे यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम