जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान– पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा...

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान– पालकमंत्री गुलाबराव पाटील

भागपूर उपसा सिंचनासाठी शासनाकडून २५० कोटींची मंजुरी; वसंतवाडी तांड्याला महसुली गावाचा दर्जा

जळगाव प्रतिनिधी– छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे शिस्तीत व पारदर्शक पद्धतीने जनतेला सेवा देण्याचे व्यासपीठ आहे. बिनअडथळा मंजूर होणाऱ्या योजना आणि रयतेच्या न्यायासाठी उभे असलेले शासन या शिबिराच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे. जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव तालुक्यातील जळके येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे’ उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गजानन महाराज मंदिरासमोरील पटांगणात उत्साहात पार पडले. विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आयोजित या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

पालकमंत्र्यांचा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केला सत्कार

यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी भागपूर उपसा सिंचन योजनेसाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तसेच वसंतवाडी तांड्याला महसुली गावाचा दर्जा देत व शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याबद्दल केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना यांनी पोखरा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच शेतपानंद रस्ते तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे यांनी सांगितले. गावाच्या विकासासाठी एकजूट राखणे गरजेचे असून चारचाकीच्या काळजीपेक्षा बैलाच्या खुराची काळजी महत्त्वाची असते, असे सांगत त्यांनी शेती व शेतकऱ्यांच्या कष्टांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच “टायगर, बॉस अशा शब्दांपेक्षा ‘मी शेतकरी आहे’ हा अभिमान प्रत्येकाने बाळगावा,” असे भावनिक प्रतिपादन करत त्यांनी उपस्थितांना केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना आवाहन केले की, अधिकाऱ्यांची एखादी सही ही एखाद्या कुटुंबाच्या भविष्यावरची सही असते, याची जाणीव प्रत्येक अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून जिल्ह्यातील कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

महिलांच्या सहभागावर भर देताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील महिला बचत गटांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला असून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ मिळाला पाहिजे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी
प्रास्ताविकात अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी सुलभपणे मिळावा या उद्देशाने राजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शेती मोजणीसह महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रक्रिया अधिक सोप्या करण्यात आल्या असून नागरिकांना दैनंदिन शासकीय कामांमध्ये येणाऱ्या अडचणी या शिबिराच्या माध्यमातून तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तसेच बळीराजा शेतपानंद रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आयुष्यमान भारत योजना ही शासनाची महत्त्वाची योजना असून प्रत्येक पात्र नागरिकाने आयुष्यमान कार्ड काढून त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शिबिरात उभारण्यात आलेल्या दहा विविध विभागांच्या स्टॉलना भेट देऊन माहिती घेतली तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या लाभांचा आढावा घेतला.

शिबिरातील ठळक लाभ
डोमिसाईल 28, डिजिटल सातबारा 156, सातबारा दुरुस्ती 34, जात प्रमाणपत्र 62, विविध शासकीय योजनांचे DBT/DLC प्रकरणे (संजय गांधी, विधवा, दिव्यांग, श्रावणबाळ) 150, वारस नोंदी 42, उत्पन्न दाखले 66, फार्मर आयडी 46 यासह इतर सेवांमधून एकूण 647 लाभार्थींना लाभ देण्यात आला. शिबिरात विविध विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते. सुमारे 600–700 नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली असून शासकीय सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्राजक्ता केदार यांनी केले, तर तहसीलदार शीतल राजपूत यांनी आभार मानले.

यांची होती उपस्थिती
यावेळी जि.प. सदस्य पवन सोनवणे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रमोद पांढरे, दूध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील, अर्जुन पाटील, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, नायब तहसीलदार डी.बी. जाधव, मंडळ अधिकारी प्रविण बेंडाळे, अजिंक्य आंधळे, उपसरपंच निवृत्ती पाटील, पी. के. पाटील, सरपंच विनोद पाटील, स्नेहा साठे, राजाराम राठोड, दिनेश पाटील, प्रदीप पाटील, धैर्यसिंग पाटील, बाळू शेरे तसेच जळके परिसरातील सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य, लाभार्थी, अधिकारी – कर्मचारी, महिला व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम