
जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस
दोन अट्टल चोरटे अटकेत
जळगाव प्रतिनिधी
शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जबरी चोरीचा एक गंभीर गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणण्यात यश आले आहे. शिवाजी नगर उड्डाण पूल ते सुरत रेल्वे गेटदरम्यान रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला मारहाण करून १७ हजार रुपये लंपास करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मंगळवारी, ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रवींद्र बाबुलाल लुले (वय ४७, रा. राजमालती नगर, जळगाव) हे रिक्षाने प्रवास करत होते. बौद्ध विहाराजवळील गेंदालाल मिल परिसरात सहप्रवासी असलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील १७ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले. घटनेनंतर लुले यांनी तत्काळ जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू करत गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. तक्रारदाराच्या वर्णनाच्या आधारे बुधवारी, ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता गेंदालाल मिल परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
वसीम तेली शेर अली तेली (वय ३५, रा. गेंदालाल मिल, जळगाव) शेख अर्शद शेख हमीद उर्फ हर्षद अण्णा (वय २६, रा. गेंदालाल मिल, जळगाव)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी आरोपींना गुन्ह्याच्या वेळी परिधान केलेल्या कपड्यांसह अटक केली असून त्यांच्याकडून १२ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पकडलेला प्रमुख आरोपी वसीम तेली हा नुकताच येरवडा कारागृहातून बाहेर पडलेला असून तो यापूर्वीही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम