जळगावात अपघातांनंतर रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू

ब्रेक फेल ट्रकने दिली होती अनेक वाहनांना धडक

बातमी शेअर करा...

जळगावात अपघातांनंतर रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू

ब्रेक फेल ट्रकने दिली होती अनेक वाहनांना धडक
जळगाव प्रतिनिधी

छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलावर शनिवारी, २२ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता भीषण अपघात झाला. उड्डाणपुलावरून जात असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक उतारावरून वेगाने मागे आला. त्यामुळे पुलाजवळ उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून, रिक्षाचालक सुरेश रूपचंद जैस्वाल (वय ५५) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, सुरत रेल्वेगेटजवळील मालधक्क्यातून सिमेंट भरून निघालेला (एमएच १९, सीवाय ७७४५) क्रमांकाचा ट्रक शिवाजीनगर उड्डाणपुलावरून जात होता. पुलावर काही अंतर कापल्यानंतर अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले, त्यामुळे ट्रक उतारावरून भरधाव मागे सरकू लागला. मोठ्या वेगाने रिव्हर्स आलेल्या ट्रकने तीन रिक्षा आणि चार ते पाच दुचाकींना चिरडले. या घटनेत अनेक नागरिक जखमी झाले असून, स्थानिक रहिवाशांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.

राधाकृष्ण नगरातील रहिवासी आणि रिक्षाचालक सुरेश रूपचंद जैस्वाल या अपघातात गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्ते सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सुरेश रूपचंद जैस्वाल आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षा चालवून करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या अंत्ययात्रेचे आयोजन २३ मार्च रोजी दुपारी चार वाजता त्यांच्या राहत्या घरातून करण्यात आले आहे.

या अपघाताची गंभीर दखल घेत स्थानिक प्रशासनाने त्वरित तपास सुरू केला आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम