जळगावात निवृत्त कर्मचाऱ्याला ‘डिजिटल अटक’ची भीती; १८ लाख २१ हजारांचा गंडा

बातमी शेअर करा...

जळगावात निवृत्त कर्मचाऱ्याला ‘डिजिटल अटक’ची भीती; १८ लाख २१ हजारांचा गंडा

​’सायबर’ भामट्यांचा पोलीस अधिकारी बनून वृद्धावर जाळा; बनावट वॉरंट आणि हुकूमनामा पाठवून केली फसवणूक 

​जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात सायबर भामट्यांनी एका निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला पोलीस आणि कायदेशीर कारवाईची भीती दाखवून तब्बल १८ लाख २१ हजार ८२७ रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘डिजिटल अटक’ (Digital Arrest) नावाच्या नव्या प्रकारचा वापर करून आरोपींनी ७१ वर्षीय वृद्धाला मानसिक दडपणाखाली आणले आणि त्यांच्या आयुष्यभराची पुंजी लुटली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी मनोहर वसंत चौधरी (वय ७१) हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले असून सध्या शेती करतात. १७ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सायबर गुन्हेगारांनी त्यांच्याशी संपर्क साधला. भामट्यांनी ‘Data Protection Board of India’ मधून बोलत असल्याचे भासवले. संशयित आरोपींनी स्वतःची ओळख “राज मल्होत्रा” आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी “संदीप रॉय” अशी बनावट नावे सांगून करून दिली. आरोपींनी चौधरी यांच्या व्हॉट्सॲपवर संपर्क साधून “तुमच्या नावे विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत,” असे सांगून त्यांना घाबरवून सोडले.

​चौधरी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी या भामट्यांनी चक्क पोलीस विभाग आणि न्यायालयाचे बनावट हुकूमनामा तसेच अटक वॉरंट व्हॉट्सॲपवर पाठवले. “तुम्हाला या प्रकरणात तात्काळ अटक होऊ शकते,” अशी धमकी देऊन त्यांना अनेक दिवस ऑनलाइन देखरेखीखाली म्हणजेच ‘डिजिटल अटक’ करून ठेवले. या कायदेशीर कारवाईच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी आरोपींनी पैशांची मागणी केली. कमालीचे घाबरलेल्या चौधरी यांनी आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर आरटीजीएस (RTGS) आणि एनईएफटी (NEFT) द्वारे वेळोवेळी एकूण १८ लाख २१ हजार ८२७ रुपये पाठवले.

​पैसे पाठवल्यानंतरही आरोपींकडून आणखी मागणी होऊ लागल्याने आणि संशयास्पद हालचालींमुळे आपली फसवणूक झाल्याचे चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ जळगाव सायबर पोलीस स्टेशन गाठून याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून अशा प्रकारे ‘डिजिटल अटक’ केली जात नाही, त्यामुळे नागरिकांनी अशा फोन कॉल्सना बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम