
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नोव्हेंबरच्या नुकसानीपोटी मिळणार १० कोटींची भरपाई
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नोव्हेंबरच्या नुकसानीपोटी मिळणार १० कोटींची भरपाई
१०,६५९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार निधी; शासनाकडून अखेर निधी मंजूर
जळगाव:
नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर सुखद बातमी आली आहे. या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली असून, जिल्ह्यातील १० हजार ६५९ शेतकऱ्यांना एकूण १० कोटी ४१ लाख १२ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
८ हजार हेक्टरवरील पिकांचे झाले होते नुकसान
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे ८,३१४.५३ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने २४ डिसेंबर २०२५ रोजी शासनाकडे निधीची मागणी केली होती. ९ एप्रिल रोजी या निधीच्या वितरणाचा शासन निर्णय (GR) निर्गमित झाल्याने आता मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
खरीप हंगामापूर्वी ‘डीबीटी’द्वारे मदत
सध्या खरीप हंगाम तोंडावर असून शेतकरी बियाणे, खते आणि इतर मशागतीसाठी पैशांच्या जुळवाजुळवीत आहेत. अशा वेळी ही मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. ही सर्व रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
पारदर्शक आणि जलद वितरण
काही भागातील शेतकऱ्यांना यापूर्वीच भरपाई मिळाली होती, मात्र अनेक शेतकरी तांत्रिक कारणांमुळे प्रतीक्षेत होते. आता नव्या शासन निर्णयामुळे उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम लवकरच वर्ग केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी नव्याने उभारी मिळण्यास मदत होणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम