
जळगाव–मनमाड चौथ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
जळगाव–मनमाड चौथ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
२०१३ च्या कायद्यानुसारच मोबदला द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा
चाळीसगाव : जळगाव ते मनमाड चौथ्या रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला तालुक्यातील पातोंडा व खरजई येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसारच मोजणी व योग्य मोबदला द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
सोमवारी पातोंडा ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस स्पष्ट नकार देत आपली भूमिका ठामपणे मांडली. या वेळी मध्य रेल्वे भुसावळ येथील सिनिअर सेक्शन इंजिनिअर राजेश कुमार, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर रायबोले, पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ, सरपंच काशिनाथ शिरसाट, पोलिस पाटील शरद महाजन, माजी सभापती संजय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
भूसंपादनामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करत, शेती हेच आमच्या उपजीविकेचे एकमेव साधन असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जमिनीचे विभाजन झाल्यास शेती करणे कठीण होईल तसेच रेल्वे ट्रॅकपलीकडील जमिनीचे अवमूल्यन होईल, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.
शेतकऱ्यांनी २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसारच प्रक्रिया राबवण्याची मागणी करत, कलम ११ अंतर्गत अधिसूचना काढून मोजणी करावी, कलम २६ ते ३० नुसार बाजारभाव निश्चित करावा आणि कलम ३१ नुसार आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली. याशिवाय शेतीसाठी अंडरपास व सर्व्हिस रोडची तरतूद करावी, तसेच विहीर, गोठा, शेड, पाइपलाइन आदींच्या नुकसानभरपाईसह पुनर्वसन लाभ लेखी स्वरूपात देण्याची मागणीही करण्यात आली.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम