
जिल्हा बँकेची ऐतिहासिक झेप; ४१५५ कोटी ठेवींचा टप्पा पार
जिल्हा बँकेची ऐतिहासिक झेप; ४१५५ कोटी ठेवींचा टप्पा पार
९५ टक्के कर्जवसुली; शेतकरी सभासदांचा वाढता विश्वास
जळगाव : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ४ हजार १५५ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला आहे. ठेवींमध्ये झालेली ही मोठी वाढ आणि ९५ टक्के कर्जवसुलीमुळे बँकेने यंदा ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
३१ मार्च २०२६ अखेर बँकेने एकूण १ हजार ७२ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले असून त्यापैकी तब्बल १ हजार १७ कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे अल्पमुदत शेती कर्जाच्या वसुलीत ९५ टक्के यश मिळाले असून, शेतकरी सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे बँक प्रशासनाने सांगितले.
जिल्हा बँकेमार्फत ३९ हजार ४५५ शेतकरी सभासदांना थेट कर्जपुरवठा करण्यात आला आहे. तसेच २५६.४७ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. याशिवाय अनिष्ट तफावतीत अडकलेल्या विविध कार्यकारी संस्थांना सुमारे ३०० कोटी रुपयांचे व्याजमाफी देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक संस्था अवसायनात जाण्यापासून वाचल्या आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील १५५ प्राथमिक विविध कार्यकारी संस्थांनी १०० टक्के कर्जफेड करून आदर्श निर्माण केला आहे. या यशामध्ये संस्थांचे पदाधिकारी, सचिव तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
या यशाबद्दल बँकेचे चेअरमन संजय पवार, उपाध्यक्ष आमदार अमोल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आणि संचालक मंडळाने शेतकरी सभासद, विविध कार्यकारी संस्था आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम