
झाडांच्या फांद्या छाटण्यावर मनपाची कडक अट; पूर्वपरवानगी अनिवार्य
झाडांच्या फांद्या छाटण्यावर मनपाची कडक अट; पूर्वपरवानगी अनिवार्य
जळगाव (प्रतिनिधी) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात महावितरणकडून होणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणीच्या कामावर महापालिकेने कडक निर्बंध लागू केले आहेत. यापुढे कोणत्याही भागात फांद्या छाटण्यापूर्वी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
दरवर्षी छाटणीच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड केली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. तसेच छाटलेल्या फांद्या रस्त्यावरच टाकून दिल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिकेने महावितरणला स्पष्ट निर्देश दिले आहेत.
मनपाने पाठवलेल्या पत्रानुसार, फांद्या छाटण्यापूर्वी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांची लेखी संमती घेणे बंधनकारक राहणार आहे. तसेच काम सुरू करण्याच्या एक दिवस आधी बांधकाम विभागालाही याची माहिती देणे आवश्यक असेल.
याशिवाय, छाटणीदरम्यान महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे अनियंत्रित झाडतोड रोखली जाईल आणि शहरातील पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम