
तापमानाचा पारा ३५ अंशांवर; आरोग्याची काळजी घ्या
तापमानाचा पारा ३५ अंशांवर; आरोग्याची काळजी घ्या
निर्जलीकरण, उष्माघाताचा धोका; आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा
जळगाव : प्रतिनिधी — जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. हिवाळ्याची चाहूल संपताच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली असून आगामी दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी त्वचारोगांसह एकूण आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
ऋतू बदलाच्या काळात शरीराला नव्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. वाढत्या उष्णतेमुळे निर्जलीकरण, उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा तसेच त्वचारोगांचे प्रमाण वाढू शकते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि उन्हात काम करणारे मजूर यांना अधिक धोका संभवतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ वापरणे, हलक्या रंगाचे सैल व सुती कपडे परिधान करणे फायदेशीर ठरते. दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. चहा, कॉफी व कार्बोनेटेड पेये कमी घ्यावीत तसेच जड, तेलकट व मसालेदार आहारावर नियंत्रण ठेवावे.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयांत उष्माघात कक्ष सज्ज ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.
“उन्हाळ्याला सुरुवात होत असल्यामुळे नागरिकांनी आरोग्य जपण्याला प्राधान्य द्यावे. उन्हात फिरल्यानंतर अशक्तपणा, डोकेदुखी किंवा चक्कर येत असल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”
— डॉ. पाराजी बाचेवार, मेडिसिन तज्ज्ञ, जीएमसी

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम