तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरात विक्रमी यश; १३१ शस्त्रक्रियांनी नवा इतिहास

बातमी शेअर करा...

तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरात विक्रमी यश; १३१ शस्त्रक्रियांनी नवा इतिहास

मोफत आरोग्यसेवेचा लाभ; रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद, आत्मविश्वासात वाढ

जळगाव : तिरळेपणा या नेत्रविकारावर प्रभावी उपचार उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने घालून दिला आहे. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरात अवघ्या दोन दिवसांत तब्बल १३१ यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या असून, जिल्ह्यातील नेत्रसेवेच्या क्षेत्रात हा एक नवा विक्रम ठरला आहे.

जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
या शिबिराला जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठ्या संख्येने रुग्णांनी प्रतिसाद दिला. एकूण १४३ रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली. त्यापैकी पात्र ठरलेल्या रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करण्यात आल्या. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत विविध वयोगटातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

तज्ज्ञ डॉक्टरांची संयुक्त टीम कार्यरत
पुण्यातील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली २० सदस्यीय तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, तंत्रज्ञ व नर्सिंग स्टाफची टीम या शिबिरात सहभागी झाली होती. अत्याधुनिक उपकरणे आणि अनुभवी वैद्यकीय पथकामुळे सर्व शस्त्रक्रिया सुरक्षित आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या.

तिरळेपणा विकारावर प्रभावी उपचार शक्य
तिरळेपणा हा डोळ्यांच्या स्नायूंशी संबंधित विकार असून, वेळेत निदान व योग्य शस्त्रक्रिया केल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. या विकारामुळे दृष्टीबरोबरच व्यक्तीच्या आत्मविश्वासावरही परिणाम होतो. मात्र, या शिबिरामुळे अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे.

नेत्रविभागाचे नियोजनबद्ध कार्य कौतुकास्पद
शिबिराच्या यशस्वी आयोजनामागे रुग्णालयातील नेत्रविभागाचा मोठा वाटा असून, तपासणीपासून शस्त्रक्रिया आणि नंतरच्या देखभालीपर्यंत सर्व प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. विभागप्रमुख डॉ. एन.एस. आर्विकर आणि त्यांच्या टीमने यासाठी विशेष परिश्रम घेतले.

रुग्ण व कुटुंबीयांकडून कृतज्ञता व्यक्त
आर्थिक अडचणींमुळे उपचार न घेऊ शकणाऱ्या अनेक रुग्णांना या शिबिरामुळे मोठा दिलासा मिळाला. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले असून, कुटुंबीयांनी डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 

ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागातील अनेक रुग्ण तिरळेपणासारख्या विकाराकडे दुर्लक्ष करतात किंवा आर्थिक अडचणींमुळे उपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा मोफत शिबिरांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळतो. योग्य वेळी निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास रुग्णांचे आयुष्य अधिक चांगले होऊ शकते.

– डॉ. उल्हास पाटील, अध्यक्ष गोदावरी फाउंडेशन

तिरळेपणा हा पूर्णपणे उपचारयोग्य विकार आहे. अनेक वेळा पालक किंवा रुग्ण त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मात्र योग्य वेळी शस्त्रक्रिया केल्यास रुग्णांचे डोळे सरळ होऊ शकतात आणि त्यांची दृष्टी सुधारते. जळगावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर हे शिबीर आयोजित करण्यात आले हे कौतुकास्पद आहे.
-डॉ. मधुसूदन झंवर, नेत्रतज्ज्ञ, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान

समाजातील गरजू रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचा मुख्य उद्देश आहे. भविष्यातही अशा प्रकारचे विविध आरोग्य शिबिरे आयोजित करून अधिकाधिक रुग्णांना उपचाराची संधी देण्यात येणार आहे.
– डॉ. एन.एस. आर्विकर, नेत्र विभागप्रमुख, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम