
थकबाकीमुळे पाणीपुरवठा व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता
थकबाकीमुळे पाणीपुरवठा व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता
महावितरणचा इशारा; ९५० कोटींच्या घरात थकबाकी
जळगाव : महावितरणच्या जळगाव परिमंडलांतर्गत जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी तब्बल ९५० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली असून, थकबाकीदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यास वीजपुरवठा कधीही खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. यामुळे संभाव्य पाणीटंचाई आणि रस्त्यांवरील अंधाराची जबाबदारी संबंधित विभागांवर राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणकडे ४ हजार ३४९ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे ४८१ कोटी रुपयांची थकबाकी आहे, तर ५ हजार ६३३ पथदीप ग्राहकांकडे ४७६ कोटी रुपयांचे वीजबिल थकित आहे. वारंवार पत्रव्यवहार, स्मरणपत्रे, प्रत्यक्ष भेटी आणि मोबाईल संदेशांच्या माध्यमातून थकबाकी भरण्याचे आवाहन करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
मंडलनिहाय पाहता, जळगाव मंडलातील २३३९ पाणीपुरवठा योजनांकडे २८७ कोटी २४ लाख, धुळे मंडलातील ११६२ योजनांकडे १३५ कोटी ३५ लाख, तर नंदुरबार मंडलातील ८४८ योजनांकडे ५९ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. पथदिव्यांच्या बाबतीत जळगाव मंडलातील २७५७ ग्राहकांकडे १८१ कोटी ५८ लाख, धुळे मंडलातील १४०८ ग्राहकांकडे १३७ कोटी ३ लाख, तर नंदुरबार मंडलातील १४६८ ग्राहकांकडे १५७ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे.
चालू आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना महावितरणने वसुली मोहिमेला वेग दिला असून, वीजपुरवठा खंडित होण्यापूर्वी संबंधित विभागांनी तातडीने थकबाकी भरावी, असे आवाहन मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम