
धोरणनिर्मितीसाठी अचूक जनगणना आवश्यक : रोहन घुगे
धोरणनिर्मितीसाठी अचूक जनगणना आवश्यक : रोहन घुगे
जनगणना २०२७ साठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
जळगाव : प्रतिनिधी
जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून प्रभावी धोरणनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जनगणना संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनगणना २०२७ अनुषंगाने तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाले. दि. २३ ते २५ मार्चदरम्यान हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
डिजिटल पद्धतीमुळे प्रक्रियेत आमूलाग्र बदल
यावेळी बोलताना घुगे यांनी सांगितले की, २०११ ते २०२६ या कालावधीत जनगणना प्रक्रियेत मोठे बदल झाले असून पारंपरिक कागदी पद्धतीऐवजी आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. यामध्ये रिअल टाइम मॉनिटरिंग, डॅशबोर्ड आणि गुणवत्ता नियंत्रणाची यंत्रणा विकसित करण्यात आली असून त्यामुळे प्रगणक व पर्यवेक्षकांच्या कामावर प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.
अधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन
या प्रशिक्षणादरम्यान प्रगणक आणि पर्यवेक्षकांना विविध तांत्रिक व प्रशासकीय बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. मार्च अखेरचा कालावधी व्यस्त असला तरी सर्वांनी हे प्रशिक्षण गांभीर्याने घेऊन पूर्ण लक्षपूर्वक आत्मसात करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
‘वन्स इन अ लाइफटाइम’ संधी
जनगणना प्रक्रियेत सहभागी होणे हा प्रत्येकासाठी ‘वन्स इन अ लाइफटाइम’ अनुभव असल्याचे सांगत, ही जबाबदारी संधी म्हणून स्वीकारावी, असेही घुगे यांनी नमूद केले.
प्रमुख प्रशिक्षकांचे मार्गदर्शन
या शिबिरात सहायक संचालक अजय ठाकूर (जनगणना संचालनालय, मुंबई) आणि प्रतिनिधी विशाल दिवेकर हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी वैशाली चव्हाण, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदांचे मुख्याधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम