नसीब पान सेंटरने बदलले गुलाबभाऊंचे नशीब !

शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून राज्यात निर्माण झाली ओळख

बातमी शेअर करा...

नसीब पान सेंटरने बदलले गुलाबभाऊंचे नशीब !
शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून राज्यात निर्माण झाली ओळख

जळगाव प्रतिनिधी

राजकारणाची कुठलीही पार्शवभूमी नसतांना एका पान टपरी चालकापासून थेट मंत्री पद गाठण्याची किमया गुलाबराव पाटील यांनी करून दाखविली आहे.
राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला, अल्पसंख्यांक समाजातून येणारा एक तरूण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरीत होतो आणि राजकारणात उतरतो. 1980 च्या दशकात विशीच्या आत असलेला हा तरूण आपल्या गावात शिवसेनेची शाखा उघडतो, धारदार वक्तृत्व आणि आक्रमक स्वभावाच्या बळावर तरूणांचे संघटन उभारतो. शिवसेनेच्या या कठीण काळात अनेक आक्रमक आंदोलने करतो. शिवसैनिकांना न्याय मिळावा यासाठी थेट विधानसभा अध्यक्षांचीच गाडी अडवतो आणि प्रसंगी तुरुंगातही जातो. वयाच्या पंचविसाव्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून जातो. तिसाव्या वर्षी जिल्हा परिषदेचा सभापती होतो. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना सुरू झालेला हा प्रवास केवळ जिल्हा परिषदेपर्यंत थांबत नाही, वयाच्या बत्तीसाव्या वर्षी विद्यमान आमदाराचा पराभव करून हा तरूण महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचतो. शेती – मातीच्या प्रश्नांवरून विधानसभा दणाणून सोडतो. मतदारसंघात बैलगाडीवर शिंगाडा मोर्चा काढत शेतकऱ्यांचा आवाज बनतो. या जोरावर दुसऱ्या निवडणुकीतही विजय मिळवतो. खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळख मिळालेला हा तरूण म्हणजेच गुलाबराव पाटील.

अवघ्या पाच महिन्यांचे असतांना गुलाबराव पाटील यांच्या आईचे निधन झाले, पुढे काकुंनी त्यांचा सांभाळ केला. घरची परिस्थीती अतिशय सामान्य पण बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांचा प्रभाव पडल्याने ते शिवसेनेच्या वादळात सामील झाले. धरणगाव तालुक्यातील पाळधी या आपल्या गावात त्यांनी शिवसेनेची शाखा स्थापन केली आणि शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमध्ये आक्रमक भूमिका पार पाडली. या दरम्यान उपजिविकेसाठी गुलाबराव पाटील यांचा खटाटोप सुरू होता. गावातच त्यांनी नसीब पान सेंटर सुरू केले सोबतच शिवसैनिकांना सोबत घेउन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा त्यांचा उद्योगही सुरूच होता. आपल्या आक्रमक भाषणांमुळे शिवसैनिकांची मोठी फळी त्यांनी निर्माण केली होती. शिवसैनिकांसह अनेक आक्रमक आंदोलने गुलाबराव पाटील करत होते. पाळधी गावात झालेल्या दंगलीत त्यांना कारागृहातही जावे लागले होते. अशातच शिवसैनिकांवर पोलिसांनी केलेल्या अन्यायाच्या एका प्रकरणात गुलाबराव पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाला सुरूवात केली. त्यावेळी चोपड्याचे अरूणभाई गुजराथी विधानसभेचे अध्यक्ष होते. अरूणभाई जळगाव येथून चोपडा येथे जात असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांना मिळाली. जळगाव हून चोपडा येथे जाणारा एक रस्ता गुलाबराव पाटील यांच्या गावावरून म्हणजेच पाळधी येथून जातो. गुलाबराव पाटील यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता सहकारी शिवसैनिकांना सोबत घेतले आणि पाळधी गावावरून पुढे जायला निघालेल्या विधानसभा अध्यंक्षांची गाडी अडवली. शिवसैनिकांना न्याय मिळवण्याचे अश्वासन अरूणभाईंकडून घेतले आणि मगच गाडी पुढे जाउ दिली.

अशा बेधडक आंदोलनांमुळे गुलाबराव पाटील परिसरात चांगलेच लोकप्रिय झाले. 1992 मध्ये वयाच्या पंचविसाव्या वर्षी पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. पुढे 1997 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली आणि कृषी सभापतीही झाले. वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी गुलाबराव पाटील यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एरंडोल – धरणगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत दोन वेळा आमदार राहिलेल्या महेंद्रसींग पाटील या जनता दलाच्या जेष्ठ नेत्याला पराभवाची धुळ चारत गुलाबराव पाटील पहिल्यांदा आमदार झाले. 1999 साली पहिल्यांदा विधानसभेत पोहोचलेल्या गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून विधानसभेत आवाज उठवला. तसेच इकडे मतदारसंघात देखील शिंगाडा मोर्चे काढत शेतकऱ्यांच्या मागण्या लावून धरल्या. पुढे 2004 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा गुलाबराव पाटील विजयी झाले. पहिल्या निवडणुकीत गुलाबराव पाटील यांना 4 हजार 90 इतके मताधिक्य मिळाले होते. यावेळी मात्र ते 11 हजार 338 मतांनी विजयी झाले, सलग दुसऱ्या निवडणुकीत त्यांनी महेंद्रसींग पाटील यांचा पराभव केला.

2008 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि एरंडोल – धरणगाव मतदारसंघात मोठा फेरबदल झाला. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला आणि गुलाबरावांना मताधिक्य देणारा एरंडोल तालुका पारोळा मतदारसंघाला जोडण्यात आला. धरणगाव आणि जळगाव तालुका असा मिळून जळगाव ग्रामीण हा मतदारसंघ निर्माण झाला. नव्याने निर्माण झालेल्या या मतदारसंघात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गुलाबराव देवकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पराभवामुळे खचून न जाता शिवसेनेच्या या ढाण्या वाघाने जळगाव ग्रामीण मतदारसंघात कार्यकर्त्यांची फळी वाढवायला सुरूवात केली. पाच वर्षात एकेक कार्यकर्ता हा गडी जोडत राहिला आणि 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत गुलाबराव देवकरांचा पराभव केला. पालकमंत्री राहिलेल्या गुलाबराव देवकर यांना या निवडणुकीत केवळ 27 टक्के मते मिळाली आणि 31 हजार मतांनी गुलाबराव पाटील विजयी झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये गुलाबराव पाटील यांनी मागे वळून पाहिले नाही. जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात कारागृहात असल्याने 2019 ची विधानसभेची निवडणुक देवकरांना लढता आली नाही. या निवडणुकीत भाजप बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांचा पराभव करत गुलबराव पाटील निवडून आले. तर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव देवकर यांचा पराभव करत गुलाबराव पाटील पाचव्यांदा विधानसभेत पोहोचले.

2014 मध्ये शिवसेना – भाजपचे सरकार राज्यात आले, मात्र गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळाले नाही. दोन वर्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव खडसे यांचे संबंध ताणले गेले. राज्याच्या व जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात यामुळे मोठे बदल झाले. एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गिरीश महाजन यांच्याकडे राज्यातील बडी खाती सोपवत त्यांना ताकद देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. याच वेळी झालेल्या मंत्री मंडळ विस्तारात गुलबराव पाटील यांना राज्यमंत्री पद देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाखातर गुलबराव पाटील यांना राज्यमंत्री पद मिळाल्याची चर्चा त्यावेळी झाली. गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात असलेल्या वादाची त्याला पार्श्वभूमी होती. गुलाबराव पाटील आणि एकनाथराव खडसे यांच्यात असलेला वाद जळगाव जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या लग्नाच्या दिवशीच एकनाथराव खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जळगाव न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गुलाबराव पाटील यांचे प्रमोशन झाले आणि पाणीपुरवठा खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली. पुढे 2022 मध्ये शिवसेनेत बंड झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात देखील कॅबिनेट मंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांनी काम पाहिले. 2024 मध्ये आलेल्या महायुती सरकारमध्ये गुलाबराव पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा पाणीपुरवठा खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून चौथ्यांदा ते मंत्री झाले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम