
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून व्याजातून दिलासा
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून व्याजातून दिलासा
३१ मार्चपर्यंत कर्जफेडीची अट; १.६४ लाख शेतकरी ५० हजारांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पीककर्ज घेतलेल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय बँकेने घेतला आहे. यावर्षी वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बँक व्याज आकारणार नसल्याची घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सोमवारी दिली.
१.६४ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ
बँकेच्या या निर्णयाचा लाभ एप्रिल २०२५ मध्ये पीककर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील सुमारे १ लाख ६४ हजार ८६५ शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांनी एकूण १०७२ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले असून त्यावरील सुमारे ६४ कोटी ३२ लाख रुपयांचे व्याज सध्या बँक घेणार नाही. त्यामुळे वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
३१ मार्चपर्यंत कर्जफेड अनिवार्य
मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जफेड करणे बंधनकारक राहणार आहे. निर्धारित मुदतीत कर्जाची परतफेड करणारे शेतकरीच शासनाकडून जून महिन्यात दिल्या जाणाऱ्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत.
कर्जवाटपाबाबत महत्त्वाचा निर्णय
दरम्यान, विकास सोसायट्यांना थेट फायनान्स न देता सोसायटीमार्फतच कर्ज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे कर्जवाटप प्रक्रियेत पारदर्शकता येणार असल्याचे सांगण्यात आले.
कर्जमाफीचा लेखाजोखा
राज्य शासनाने दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेले ८१ हजार ३९४ शेतकरी असून त्यांच्याकडे २७३ कोटी २७ लाख रुपयांचे कर्ज व १३७ कोटी १ लाख रुपये व्याज थकले आहे. तसेच दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या १० हजार ८६१ शेतकऱ्यांकडे २२६ कोटी ५८ लाख रुपयांचे मुद्दल आणि ३२८ कोटी १० लाख रुपये व्याज थकीत आहे. या शेतकऱ्यांना जून महिन्यात कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे.
गटसचिवांच्या पगाराचा प्रश्न मार्गी
गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २४५ गटसचिवांच्या पगाराचा प्रश्नही अखेर सुटला आहे. थकबाकीदारांनी कर्ज न फेडल्यामुळे गटसचिवांचे सुमारे ७ कोटी ६७ लाख ७७ हजार रुपये पगार थकीत होते. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत विकास सोसायट्यांना फिक्स लोन देऊन हे पगार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
गतवर्षीही मिळाला होता दिलासा
गतवर्षीही जिल्हा बँकेने व्याजातून दिलासा देण्याची योजना राबवली होती. त्या वेळी १ लाख ५६ हजार ३२१ शेतकऱ्यांनी सुमारे ८०३ कोटी रुपयांचे कर्ज वेळेत फेडल्यामुळे त्यांना ४८ कोटी रुपयांचा व्याजातून दिलासा मिळाला होता.
“नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा बँकेचा उद्देश आहे. त्यामुळे वेळेत कर्जफेड करणाऱ्यांकडून व्याज आकारले जाणार नाही.”
– संजय पवार, अध्यक्ष, जिल्हा बँक

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम