
पंचायत समितीत खा. स्मिता वाघ यांची आढावा बैठक
पंचायत समितीत खा. स्मिता वाघ यांची आढावा बैठक
प्रतिनिधी I जळगाव
खासदार स्मिता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली जळगावच्या पंचायत समितीत विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, मिलिंद चौधरी, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील, तालुका सरचिटणीस गिरीश वराडे, रामचंद्र पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष निवृत्ती पाटील, भाजपा आयटी सेल जिल्हाध्यक्ष वासुदेव कोळी, अभियंता शिसोदे , ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बबन वाघ , अतिरिक्त गटविकास अधिकारी योगिता पाटील यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला. लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्याने, संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते लवकर वितरित करावेत, असे निर्देश खासदार स्मिता वाघ यांनी दिले. “शासनाच्या योजना वेळेत पोहोचल्या नाहीत, तर त्याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसतो,” असे त्यांनी नमूद केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व सामान्यांना शासकीय योजनांचा तसेच पायाभूत सुविधांचा लाभ व्हावा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समाजकल्याण ,, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, सेस फंडांतर्गत मंजूर कामे, वित्त आयोगाच्या निधीतून राबविण्यात येणारी कामे, सिंचन विहीर व गाय-गोठा अनुदान योजनांचा सुद्धा आढावा घेण्यात आला. या योजनांचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवावेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, “ योजनेची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयाचे चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने आणि समन्वयाने काम करावे.”
प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी मोहिम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरच त्याचा प्रत्यक्ष लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
*****
ग्रामीण महिला उद्योजक बनल्या पाहिजेत
आढावा बैठकीत महिला बचत गटांच्या सक्षमीकरणावर भर देत, ग्रामीण महिलांना स्वावलंबी व उद्योजक बनवण्यासाठी उपाययोजना राबवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. महिला बचत गट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मजबूत आधारस्तंभ आहेत. या गटांच्या माध्यमातून अनेक महिला लघुउद्योग, घरगुती उत्पादन व सेवा क्षेत्रात काम करत असून, त्यांना योग्य प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्या मोठ्या प्रमाणात यशस्वी उद्योजक बनू शकतात. महिला बचत गटांनी केलेल्या उत्पादनांना चांगली आणि स्थिर बाजारपेठ मिळावी, यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न करावेत, स्थानिक पातळीवर प्रदर्शन, मेळावे, विक्री केंद्रे तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे (ई-कॉमर्स) या उत्पादनांची विक्री वाढवण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
– खासदार स्मिता वाघ ( जळगाव )
*****
पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंगचे प्रशिक्षण द्या
महिला गटांना व्यवसाय कौशल्य, पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, जेणेकरून त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि विक्री दोन्ही वाढतील, असेही त्यांनी सांगितले. बँकिंग सुविधा, कर्ज योजना आणि शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ महिलांपर्यंत सुलभपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
“ग्रामीण भागातील प्रत्येक महिला ही संभाव्य उद्योजक आहे. योग्य मार्गदर्शन, संधी आणि पाठबळ मिळाल्यास त्या केवळ स्वतःचा नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि गावाचा आर्थिक विकास घडवू शकतात,” असे मत खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केले. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून गावागावात आर्थिक प्रगती घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम