
पहलगाम दुर्घटना: राज्यातील चार पार्थिव मुंबईत आणले; मंत्री गुलाबराव पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली
पहलगाम दुर्घटना: राज्यातील चार पार्थिव मुंबईत आणले; मंत्री गुलाबराव पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली
जळगाव प्रतिनिधी – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी अपघातात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी चार जणांची पार्थिवे हवाईमार्गे मुंबईत आणण्यात आली असून, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विमानतळावर उपस्थित राहून या पार्थिवांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
मृतांमध्ये अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले आणि दिलीप देसले यांचा समावेश आहे. उर्वरित दोन पार्थिवे दिल्लीमार्गे पुण्यात पाठविण्यात येणार असल्याची माहिती जम्मू-काश्मीर प्रशासनाने दिली आहे. दिल्लीत येणाऱ्या पार्थिवांसोबत असलेल्या नातेवाईकांशी दिल्लीतील राजशिष्टाचार कार्यालयातील अधिकारी सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सर्व सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इतर पर्यटकांची माहिती घेण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 275 पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांची निवासव्यवस्था तसेच पुढील प्रवासासाठी आवश्यक समन्वय करण्यात येत असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम