पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा शंखनाद; महाराष्ट्रातही बारामती व राहुरीत पोटनिवडणूक

बातमी शेअर करा...
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा शंखनाद; महाराष्ट्रातही बारामती व राहुरीत पोटनिवडणूक
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान; ४ मे रोजी जाहीर होणार निकाल

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असून केंद्रीय निवडणूक आयोगाने  सोमवारी पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये एप्रिल महिन्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील रिक्त असलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे.

​मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी यांनी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निवडणुकांमध्ये ८२४ मतदारसंघांमधील १७.४ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राज्यानुसार असा आहे निवडणूक कार्यक्रम:

१. आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी (एका टप्प्यात)

  • मतदान तारीख: ९ एप्रिल २०२६
  • निवडणूक जाहिरात प्रसिद्ध: १६ मार्च
  • अर्ज भरण्याची मुदत: २३ मार्चपर्यंत
  • छाननी: २४ मार्च
  • अर्ज मागे घेण्याची मुदत: २६ मार्च

२. तामिळनाडू (एका टप्प्यात)

  • मतदान तारीख: २३ एप्रिल २०२६
  • निवडणूक जाहिरात प्रसिद्ध: ३० मार्च
  • अर्ज भरण्याची मुदत: ३ एप्रिलपर्यंत
  • छाननी: ७ एप्रिल
  • अर्ज मागे घेण्याची मुदत: ९ एप्रिल

३. पश्चिम बंगाल (दोन टप्प्यांत)

  • पहिला टप्पा (१५२ जागा): २३ एप्रिल २०२६
  • दुसरा टप्पा (१४२ जागा): २९ एप्रिल २०२६
  • वैशिष्ट्य: गेल्या निवडणुकीत आठ टप्प्यात मतदान झाले होते, मात्र यावेळी हे प्रमाण केवळ दोन टप्प्यांत आणण्यात आले आहे.

महाराष्ट्रात बारामती आणि राहुरीत पोटनिवडणूक

​राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

  • मतदान तारीख: २३ एप्रिल २०२६
  • अर्ज प्रक्रिया: ३० मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल, तर ९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
  • पार्श्वभूमी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची जागा रिक्त झाली आहे, तर आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी येथे पोटनिवडणूक होत आहे.

निकाल कधी?

या सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीचा निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम