
पाळधी येथे कत्तलीसाठी आणलेल्या गायींची सुटका
पाळधी येथे कत्तलीसाठी आणलेल्या गायींची सुटका
पोलिसांची मध्यरात्री कारवाई; आरोपी फरार, कत्तलखाना पुन्हा चर्चेत
पाळधी, ता. धरणगाव : पाळधी येथे कत्तलीसाठी आणलेल्या पाच गायी व एका वासराची पोलिसांनी सुटका करत धाडसी कारवाई केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून येथील कत्तलखाना पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
२ तारखेच्या मध्यरात्री पाळधी पोलीस गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांना गुप्त माहिती मिळाली की, नमरा कॉलनी परिसरात एका वाहनातून कत्तलीसाठी गुरे उतरवली जात आहेत.
या माहितीनुसार अमोल धोबी, संदीप खंडारे, निंबा धनगर, कल्पेश पाटील, श्री. बावीस्कर तसेच पंच पंकज चौधरी, गणेश शिंदे, मयूर व्यास, ऋषिकेश सोनार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे उभी असलेल्या पिकअप व्हॅनमध्ये पाच गायी व एक वासरू आढळून आले.
पोलिसांनी तातडीने सर्व जनावरांची सुखरूप सुटका करून त्यांना महागणपती येथील गोशाळेत हलवले. मात्र, कारवाईदरम्यान जाफर कुरेशी, अझर कुरेशी व त्यांचा एक साथीदार (नाव अज्ञात) हे तिघे आरोपी पळून गेले.
या प्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील लोहार करत आहेत.
या घटनेमुळे परिसरातील कत्तलखान्याच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून तो बंद करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम