
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन
जळगाव प्रतिनिधी l
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राजवटीत अत्यंत सुशासन, न्यायप्रियता, सामाजिक समता, आणि सर्वसामान्यांच्या हिताचे राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही आधुनिक भारतात आदर्श ठरावी अशी आहे. त्यांच्या विचारातून समाजाला दिशा मिळते, असे मत जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केले.
३० मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या “३०० किमी – ३०० वाहनांच्या भव्य रॅली” संदर्भात सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी अशोकभाऊ जैन यांची सदिच्छा भेट घेतली. मा. आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही ऐतिहासिक आणि गौरवशाली रॅली आयोजित केली जात आहे. त्यावेळी अशोकभाऊ जैन बोलत होते.
त्यांनी पुढे सांगितले की, “अहिल्यादेवी होळकर यांचे शासनकार्य हे केवळ कारभार नव्हे तर लोकसेवेचे उत्कृष्ट उदाहरण होते. त्यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या गरजांचा विचार करून विकासाची दिशा ठरवली. रस्ते, धर्मशाळा, घाट, मंदिर, जलव्यवस्था, शिक्षणसंस्था यांचे बांधकाम करून त्या काळातच त्यांनी सर्वसमावेशकतेचे उत्तम उदाहरण घालून दिले. स्त्रीशक्तीचा आदर्श कसा असावा, हे त्यांच्याकडून शिकावे लागेल.”
अहिल्यादेवींचे ज्ञानदान आणि शैक्षणिक दृष्टिकोन आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी अनेक तत्त्वज्ञ आणि धर्माचार्यांशी संवाद साधून समाजाला ज्ञानप्रद मार्गदर्शन केले. त्यांनी लोककल्याणार्थ धर्म व अध्यात्माचा उपयोग करून सामाजिक स्थैर्य निर्माण केले.
“आजच्या युवा पिढीने अहिल्यादेवींप्रमाणे समाजासाठी झोकून देण्याची प्रेरणा घ्यावी. त्यांच्या राज्यकारभाराची तत्वे म्हणजेच पारदर्शकता, सेवा, कर्तव्यनिष्ठा, आणि न्याय – ही तत्वे जर आपल्याला आत्मसात करता आली, तर खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या कार्यास अभिवादन करू शकतो,” असेही अशोकभाऊ जैन यांनी यावेळी सांगितले.
या ऐतिहासिक रॅलीमध्ये शेकडो चारचाकी वाहनांच्या माध्यमातून जिल्ह्यातून प्रेरणादायी यात्रा काढण्यात येणार असून, यामध्ये शहरातील व ग्रामीण भागातील युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था, आणि राजकीय नेते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.
ही रॅली केवळ एक वाहन यात्रा नसून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना त्रिशताब्दी वर्षात सामूहिक अभिवादन करण्याचा एक सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक उपक्रम आहे.
सदर भेटी प्रसंगी दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे, मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप तेले, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, मल्हार सेनेचे विभागीय अध्यक्ष डॉ. संजय पाटील, दिलीप नाझरकर,सचिन धनगर, अश्विन सैंदाणे आदी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम