
“प्राण गेले तरी चालतील, पण माघार नाही” — एस. जी. पाटील
“प्राण गेले तरी चालतील, पण माघार नाही” — एस. जी. पाटील
१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही ; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा
धरणगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित १० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न झाल्याने झुरखेडा येथील सरपंच एस. जी. पाटील यांनी सरकारविरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
पाटील यांच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह संबंधित विभागांकडे तक्रारी देण्यात आल्या, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
तक्रारीत माजी अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी पदाचा गैरवापर करून संबंधित संस्थेला लाभ मिळवण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचा आरोप आहे. या व्यवहारात बँकिंग नियमांचे उल्लंघन, कागदपत्रांमध्ये फेरफार आणि आवश्यक परवानग्यांचा अभाव असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
लेखापरीक्षण अहवालातही हरकती नोंदवूनही रक्कम वसुलीसाठी कारवाई न झाल्याचा आरोप करत पाटील यांनी १४ एप्रिल २०२६ पासून त्यांच्या शेतात आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे.
संबंधितांवर गुन्हा दाखल करणे, सहकार क्षेत्रातील पदांसाठी अपात्र ठरविणे आणि रक्कम व्याजासह वसूल करणे या मागण्या त्यांनी केल्या आहेत. या घोषणेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम