
प्रामाणिकपणा, अथक परिश्रम व विनम्रता हे तीन गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारल्यास यश हमखास
प्रामाणिकपणा, अथक परिश्रम व विनम्रता हे तीन गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारल्यास यश हमखास – प्रा. गणेशन कन्नबीरन
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठात दीक्षांत समारंभ
जळगाव प्रतिनिधी : प्रामाणिकपणा, अथक परिश्रम व विनम्रता हे तीन गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारले तर त्यांना जीवनात यश हमखास मिळू शकेल त्याकरीता नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ नागरिक बनविण्यास सहाय्यक ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे संचालक प्रा. गणेशन कन्नबीरन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठात दीक्षांत समारंभात केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ मंगळवार दि. २३डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या समारंभात दीक्षांत भाषण करतांना प्रा. गणेशन कन्नबीरन बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सर्वश्री राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भूकन, प्राचार्य जगदीश पाटील, प्राचार्य एस.आर. राजपूत, प्रा.जे.व्ही. साळी, प्राचार्य संजय सुराणा, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, नितीन झाल्टे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, डॉ. पराग मसराम, सीए रवींद्र पाटील हे उपस्थित होते.
प्रा. गणेशन कन्नबीरन हे पुढे बोलतांना म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे भारताची आताची शैक्षणिक प्रणालीत व उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील चौथी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे आपण आता नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देण्यावर भर दिला पाहिजे. पारंपरिक शिक्षण पद्धती ही ज्ञानावर आधारित संकल्पना व सिद्धांतांवर भर देत असे आणि क्वचितच कौशल्य, नोकरी संशोधन व नवउपक्रमासाठी ज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण करतील परंतु नवीन शैक्षणिक धोरणाने हा ट्रेंड बदललेला आहे. ज्यामध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेशन, फील्डवर्क आंतरवासियताच्या माध्यमातून व वास्तविक जगातील समस्यांवर आधारित प्रकल्प इत्यादीवर भर दिलेला आहे.
आजच्या काळात नोकऱ्या हया केवळ शैक्षणिक पात्रतेपेक्षा कौशल्यांशी अधिक प्रमाणात जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांचा विकास हा अभ्यासक्रम रचना व अंमलबजावणीचा अविभाज्य भाग असणे गरजेचे आहे. नोकरीचे कौशल्य मुख्यत्वे दोन प्रकारचे असतात सॉफ्टस्किल व हार्डस्किल, हार्डस्किल मध्ये निवडलेल्या अभ्यासक्रमांशी संबंधित मूलभूत विषयक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करतात तर सॉफ्टस्किल हे हार्डस्किल्सना पूरक व सहाय्यक असतात. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ बौद्धिक विकासापुरते मर्यादित नसून चारित्र्य घडविणे आणि सर्वांगीण संतुलित माणसे घडविणे हेही आहे.
आजच्या काळाची गरज म्हणजे जागतिक नागरिकत्व यावर आधारित सामाजिक कौशल्य विकसित करणे हा होय, विशेषतः भारत आर्थिक दृष्ट्या प्रगती करत असताना भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यात वेगवेगळ्या भाषा संस्कृती हवामानाची परिस्थिती चांगली आहे. आपण एक राष्ट्र म्हणून एकत्र आहोत. विद्यार्थ्यांना जागतिक समस्या समजून घेण्यास सक्षम करणे आणि समावेशक सहिष्णू सुरक्षित व शाश्वत समाज घडविण्यासाठी त्यांना सक्रिय बनवणे ही आपली गरज आहे. जागतिक नागरिकत्व सर्वांगीण शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून विकसित होतो आणि नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार विविध स्वरूपात साध्य केले जाते असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
आज योगा हा मनुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे, योगा आणि ध्यानाच्या माध्यमातून अंतर्गत शक्तीची वाढ होते. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. व तो प्रत्येकावर परिणामकारक ठरतो, तेव्हा योगा हा प्रत्येक विद्यार्थ्याने केला पाहिजे. या विद्यापीठाने अवघ्या ३५ वर्षात विद्यार्थीहिताचे निर्णय घेऊन चांगली प्रगती केली असून नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी देखील उत्कृष्टपणे केली आहे. तसेच देशपातळीवरही या विद्यापीठाचे नाव कोरले गेले आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी स्नातकांना उद्देशून सांगितले की, नेहमी प्रामाणिक रहा, राष्ट्रप्रेमी रहा व राष्ट्र प्रथम हे वाक्य कायम आचरणात आणा. त्यानंतर विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर करतांना गेल्या वर्षभरातील नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक वाटचाल याबद्दल माहिती दिली.विद्यापीठाची देशपातळीवर दखल घेतली गेल्याचे सांगून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळविला असल्याचे सांगितले.
यावेळी काढण्यात आलेल्या दीक्षांत मिरवणुकीच्या अग्रभागी विद्यापीठाचा मानदंड घेऊन उप कुलसचिव (अ.का.) सुनील हतागडे होते. राष्ट्रगीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीत यावेळी सादर झाले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी कुलगुरुंकडे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली. अधिष्ठाता प्राचार्य एस.आर. राजपूत यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, प्रा. अनिल डोंगरे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, डॉ.जगदीश पाटील यांनी मानव विज्ञान विद्याशाखा, डॉ. साहेबराव भुकन यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या स्नातकांना पदवी प्रदान करण्यास्तव केलेल्या विनंतीनुसार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी यांनी स्नातकांना उपदेश केला.
या समारंभात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी व प्रा. गणेशन कन्नबीरन यांच्या हस्ते सुवर्णपदके वितरित करण्यात आली. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील यांनी घोषित केली. आजच्या समारंभाचे वैशिष्टये असे की, १३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ०२ सुवर्णपदके, ०४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ०३ सुवर्णपदके, एका विद्यार्थ्याला ४ सुवर्णपदके मिळाली. सुवर्णपदके विद्यार्थ्यांना प्रदान करीत असतांना त्यांचे पालक तसेच यावेळी प्रथमच देणगीदारांचे प्रतिनीधी यांना देखील मंचावर बोलविण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रफिक शेख, खेमचंद पाटील व डॉ. विना महाजन यांनी केले. या समारंभात अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य तसेच विविध अधिकार मंडळाचे सदस्य, प्राचार्य, संस्थाचालक, देणगीदार, विद्यार्थी, पालक, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.विद्यापीठाच्या कलावंतानी बलसागर भारत होवो हे गीत सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या समारंभात, एकूण २९ हजार ९७ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली असून. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १२,२५९ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४,५९९ स्नातक, मानवविज्ञान विद्याशाखेचे ६,४१९ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे २,२६० स्नातकांचा समावेश आहे. यात स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे २८७, मुळजी जेठा महाविद्यालयाचे १२७१, प्रताप महाविद्यालयाचे ८५२, जी.एच.रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ९६३, व आर. सी. पटेल इन्स्टिटयुट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, शिरपूरचे १८७ अशा एकूण ३,५६० विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली. गुणवत्ता यादीतील १२० विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले. या मध्ये ८८ मुले व ३२ मुलींचा समावेश आहे. तसेच एक सुवर्णपदक समान गुणांमुळे दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले. या समारंभात १९५ पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांनी देखील पदवी घेतली.
केसीआयआयएलचा स्टार्टअप एक्स्पो :विद्यापीठाच्या नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य मंडळाच्या केसीआयआयएल या सेक्शन ८ कंपनीद्वारा स्टार्टअपला सहकार्य करण्यात आलेल्या व प्रत्यक्ष उत्पादन सुरु झालेल्या १४ स्टार्टअपचे प्रदर्शन आज दीक्षांत सभागृहासमोर लावण्यात आले होते. त्यावेळी प्रा. गणेशन कन्नबीरन व कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी प्रदर्शनाला भेट दिली. प्रा. गणेशन यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत स्टार्टअप उद्योजक यांना महत्वपूर्ण टीप्स दिल्या. यावेळी मूख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंडारे व रोशनी जैन, संचालक डॉ. राजेश जवळेकर हे देखील उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम