
भाचीच्या लग्नासाठी ठेवलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला
भाचीच्या लग्नासाठी ठेवलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला
दोन लाखांहून अधिक किमतीची पेटी मित्रांच्या मदतीने लंपास; तिघांना अटक, एक फरार
जळगाव : भाचीच्या लग्नासाठी आत्याने जपून ठेवलेले तब्बल २ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने भाच्यानेच मित्रांच्या संगनमताने चोरून नेल्याची धक्कादायक घटना शहरातील राजीव गांधी नगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी १ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक जण अद्याप फरार आहे.
राजीव गांधी नगर येथे वास्तव्यास असलेल्या सुनीता वामन लोंढे (वय ३४) यांनी भाचीच्या लग्नासाठी १० ग्रॅम व ३ ग्रॅम अशा दोन सोन्याच्या पोत, ८ ग्रॅमचे कर्णफुले तसेच सुमारे ४० हजार रुपये किमतीच्या कानातील साकळ्या असे एकूण २ लाख ८ हजार रुपये किमतीचे दागिने घरातील पेटीत सुरक्षित ठेवले होते. मात्र २६ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास ती पेटीच घरातून गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत त्यांनी घरच्यांकडे चौकशी केली असता, मध्यरात्रीच्या सुमारास भाचा समाधान लोंढे हा घराबाहेर जाताना दिसल्याची माहिती मिळाली. संशय बळावल्याने आत्याने समाधानकडे दागिन्यांबाबत विचारणा केली असता, त्याने मित्रांच्या मदतीने पेटी व त्यातील दागिने नेल्याची कबुली दिली. मात्र वारंवार मागणी करूनही त्याने दागिने परत न केल्याने अखेर महिलेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समाधान लोंढे याच्यासह प्रेम संजू सकट, निखील लक्ष्मण हागडगे आणि साहील अवचारे या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापैकी साहील अवचारे हा फरार असून समाधान लोंढे, प्रेम सकट आणि निखील हागडगे या तिघांना पोलीस कर्मचारी जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत आणि नीलेश पाटील यांच्या पथकाने अटक केली आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलीस करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम