
महापौर दीपमाला काळे यांच्या नेतृत्वात महामार्ग अतिक्रमण हटाव मोहिमेला गती
महापौर दीपमाला काळे यांच्या नेतृत्वात महामार्ग अतिक्रमण हटाव मोहिमेला गती
वाहनधारकांना ७ दिवसांची मुदत; त्यानंतर थेट जप्तीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दुतर्फा उभी असलेली वाहने आणि अतिक्रमणांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी कडक भूमिका घेतली असून, संबंधित वाहनधारकांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अतिक्रमण न हटविल्यास थेट जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संयुक्त बैठकीत स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त धनश्री शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, ‘नही’चे अधिकारी राहुल पाटील आणि अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर उपस्थित होते. या बैठकीत खेडी ते खोटे नगर दरम्यानचा महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
महामार्गाचा काही भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (नही) हद्दीत येत असल्याने १ एप्रिलपासून महापालिका, ‘नही’ आणि वाहतूक पोलीस संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार आहेत. तसेच महामार्गालगत सुरू असलेले कार व दुचाकींचे अनधिकृत बाजारही हटवले जाणार आहेत.
शहरातील पार्किंग समस्येवर उपाय म्हणून ३० मार्चपासून रस्त्यांवर पिवळे व पांढरे पट्टे आखून अधिकृत पार्किंग स्पॉट निश्चित केले जाणार आहेत. फेरीवाल्यांना रस्त्यावरून हटवून त्यांना मनपाच्या पडीक जागांवर ‘खाऊगल्ली’ विकसित करून पर्यायी व्यवस्था दिली जाणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम