
यावल तालुक्यातील निंबादेवी धरणात तीन दिवसानंतर तरुणाचा मृतदेह सापडला
यावल तालुक्यातील निंबादेवी धरणात तीन दिवसानंतर तरुणाचा मृतदेह सापडला
यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील सावखेडा सीमजवळील निंबादेवी धरणात रविवारी सायंकाळी अंघोळीसाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह तब्बल तीन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर मंगळवारी सापडला. जतीन अतुल वार्डे (वय १८, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने रामेश्वर कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने रामेश्वर कॉलनीतील आठ तरुण निंबादेवी धरण परिसरात फिरायला गेले होते. दुपारी तीन वाजता घरून निघाल्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांनी धरण गाठले. काही वेळातच काही तरुणांनी पाण्यात अंघोळीसाठी उतरण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, जतीन खोल पाण्यात गेला आणि बुडाला. सोबतच्या मित्रांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र कुणालाही पोहता येत नसल्याने त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार अर्शद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी, संतोष पाटील यांच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री अंधार पडल्यामुळे पहिल्या दिवशी मोहीम थांबवावी लागली.
शोधमोहीम सोमवारीही सुरू ठेवण्यात आली. अखेर मंगळवारी तिसऱ्या दिवशी मारुळ व लोसनबर्डी येथून आलेल्या कुशल पोहणाऱ्यांच्या मदतीने पुन्हा धरणात शोधमोहीम राबवली गेली आणि जतीनचा मृतदेह सापडला. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला, जिथे डॉ. प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले.
या दुर्दैवी घटनेने रामेश्वर कॉलनीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तरुणाच्या आकस्मिक मृत्यूने शोककळा पसरली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम