
युद्धजन्य परिस्थितीत परदेशात अडकलेल्या जळगावकरांबाबत जिल्हा प्रशासन सतर्क
युद्धजन्य परिस्थितीत परदेशात अडकलेल्या जळगावकरांबाबत जिल्हा प्रशासन सतर्क
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली परिस्थितीची माहिती ; नागरिकांना घाबरू न जाण्याचे केले आवाहन
जळगाव, परदेशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील काही नागरिक दुबई तसेच अन्य देशांमध्ये अडकल्याची माहिती समोर आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.
पालकमंत्र्यांनी संबंधित देशांमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत जिल्हा प्रशासनामार्फत तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित नागरिकांच्या नातेवाईकांकडून माहिती संकलित करून त्यांना योग्य ती मदत व मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी निर्देशित केले.
युद्धजन्य परिस्थितीत महाराष्ट्र शासनातर्फे सुरक्षेबाबत देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करताना त्यांनी नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट केले. शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मंत्रालय नियंत्रण कक्षाशी सातत्याने संपर्क सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून जिल्हानिहाय परदेशात अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गुगल लिंकवर जळगाव जिल्ह्यातील एकूण १२ नागरिकांची माहिती शासनाकडे पाठविण्यात आली आहे. यामध्ये चाळीसगाव येथील २ व जळगाव येथील १० नागरिकांचा समावेश आहे.
शासनाकडून पुढील मार्गदर्शन प्राप्त होताच त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी किंवा मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी ०२५७-२२१७१९३ व ०२५७-२२२३१८० या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम