
रावेर बाजार समितीवर गोरक्षक आक्रमक
अवैध गोवंश वाहतुकीवरून खडाजंगी
सावदा: प्रतिनिधि
अवैध गोवंश वाहतूक प्रकरणात रावेर बाजार समितीच्या पावत्यांचा गैरवापर होत असल्याचा आरोप गोरक्षकांनी केला आहे. या मुद्द्यावर १४ मार्च रोजी सावदा उपबाजार समितीत पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत गोरक्षक आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद झाला.
गोरक्षकांनी सांगितले की, गोरक्षणासाठी जीव धोक्यात घालून अवैध गोवंश वाहतूकदारांना पकडले जाते, परंतु न्यायालयात रावेर बाजार समितीच्या पावत्यांचा आधार घेत आरोपी सुटतात. बाजार समितीच्या या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी बारकोड स्वरूपाच्या पावत्या जारी करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे प्रत्येक पावतीची नोंद होईल आणि गैरवापर टाळता येईल.
गोरक्षकांच्या प्रमुख मागण्या:
गुरांच्या बाजाराशिवाय इतर दिवशी बाजार समितीच्या आवारात एकही गुरेढोरे ठेवता येऊ नयेत.बाजार समितीच्या आवारात सीसीटीव्ही बसवून हालचालींवर लक्ष ठेवावे.बाजार समितीच्या पावत्या अवैधरीत्या दिल्यास जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा.
येत्या आठ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा गोरक्षकांनी दिला आहे.सभापती सचिन पाटील यांनी बाजार समितीचा कारभार पारदर्शक असल्याचे सांगितले, परंतु अवैध गोवंश वाहतूकदारांना मदत करणाऱ्या पावत्या बाजार समितीतूनच बाहेर येत असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम