लग्नाच्या बहाण्याने फसवणूक; दागिने आणि रोकड लंपास

बातमी शेअर करा...

लग्नाच्या बहाण्याने फसवणूक; दागिने आणि रोकड लंपास

पहिले लग्न लपवून दुसरा विवाह; पत्नीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर (प्रतिनिधी) : पहिल्या लग्नाची माहिती लपवून दुसऱ्यांदा विवाह करून पतीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील मालखेडा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पत्नीसह तिच्या कुटुंबातील सहा जणांविरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी सुनील रामलाल नाईक (वय ३०, रा. मालखेडा) यांचा विवाह आरोपी मीनाक्षी अजमल जाधव हिच्याशी झाला होता. मात्र, लग्नापूर्वीच मीनाक्षीचे पहिले लग्न झाले असल्याची बाब तिने जाणीवपूर्वक लपवून ठेवली. विश्वास संपादन करून तिने सुनील यांच्याशी विवाह केला आणि त्यानंतर काही काळानंतर फसवणुकीचा प्रकार समोर आला.
दरम्यान, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास मीनाक्षीने तिचे वडील आजारी असल्याचे खोटे कारण सांगून घरातून बाहेर पडली. यावेळी तिने घरातील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने तसेच लग्नात मिळालेली सुमारे तीन लाख रुपयांची रोकड असा ऐवज घेऊन पलायन केले. काही दिवसांनी हा प्रकार लक्षात येताच सुनील नाईक यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी मीनाक्षी अजमल जाधव, अजमल जोहरसिंग जाधव, अरुणा अजमल जाधव, रणजित अजमल जाधव, महेश अजमल जाधव आणि गजानन जोहरसिंग जाधव (रा. वडगाव नालबंदी, ता. भडगाव, ह.मु. टिटवाळा, जि. ठाणे) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिब्रे करीत असून, अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम