
लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; भीषण अपघातात दोन ठार, १५ जखमी
लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; भीषण अपघातात दोन ठार, १५ जखमी
साक्री तालुक्यातील तामसवाडी जवळ दुर्घटना; चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले
साक्री (प्रतिनिधी) : लग्नाच्या आनंदावर विरजण घालणारी दुर्दैवी घटना साक्री तालुक्यातील तामसवाडी येथे घडली. वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिरडाणे येथून तामसवाडीच्या दिशेने वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणारे वाहन (क्र. एमएच १८ डब्ल्यू ६२२६) शनिवारी दुपारी सुमारे २ वाजता निघाले होते. अक्कलपाडा जवळील पौरबाबा मंदिर परिसरात समोरून येणाऱ्या एका वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन उलटले.
या भीषण अपघातात काव्या स्वप्निल पाटील (वय ३, रा. शिरडाणे) आणि भटुबाई साहेबराव पाटील (वय ४८, रा. बिडगाव, ता. चोपडा) यांचा जागीच मृत्यू झाला.
१५ जण जखमी
या अपघातात गितेश्वरी अविनाश पाटील (६), सुशिलाबाई शांताराम पाटील (६५), कल्याणी रवींद्र पाटील (३५), पंकज पाटील (४५), चैताली पृथ्वीराज पाटील (१८), प्रांजल नितीन पाटील (२२), जागृती छोटू पाटील (४०), दीपाली रोहिदास पाटील (२१), भूमिका गुलाब पाटील (१८), वैष्णवी महेंद्र पाटील (१९), भिकुबाई शिवदास पाटील (५५), मनिषा संतोष बाविस्कर (३५), नयना सुखदेव पाटील (१०), इंदुबाई पांडुरंग पाटील (७०) आणि चमाबाई थिला पाटील (६५) हे जखमी झाले आहेत.
तातडीने मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम