
लाच मागणारा रिंगणगाव सरपंच दोन पंटरांसह जाळ्यात
लाच मागणारा रिंगणगाव सरपंच दोन पंटरांसह जाळ्यात
एसीबीच्या पथकाची कारवाई
जळगाव : प्रतिनिधी जळगावमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाचा हस्तांतर करारनामा करण्यासाठी लाच मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत रिंगणगाव (ता. एरंडोल) येथील सरपंच भानुदास पुंडलिक मते यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच्यासह दोन खाजगी व्यक्तींविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
माहितीनुसार, तक्रारदार शासकीय ठेकेदार यांनी जलजीवन मिशन अंतर्गत ₹१,५०,२३,३२१/- च्या नळपाणी योजनेचे काम पूर्ण केले होते. यापूर्वी त्यांना ₹१,२७,२३,३२१/- मिळाले होते, परंतु उर्वरित अंदाजे ₹२३,००,०००/- चे अंतिम देयक प्रलंबित होते. हे देयक मिळवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंचाचा हस्तांतर करारनामा आवश्यक होता.
तक्रारदारांनी सरपंच भानुदास मते आणि ग्रामपंचायत सदस्याचे पती समाधान काशिनाथ महाजन यांची भेट घेतली असता, त्यांनी हस्तांतर करारनामा करून देण्यासाठी ₹१,००,०००/- लाच मागितली. तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिला व दि. ०६/१०/२०२५ रोजी लेखी तक्रार दाखल केली. एसीबीच्या पडताळणीमध्ये ₹८०,०००/- रक्कमेची लाच स्वीकारण्याची माहिती समोर आली.
सापळा कारवाईत, दि. ०७ ऑक्टोबर रोजी काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सरपंच भानुदास मते आणि समाधान महाजन यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम संतोष नथ्थु पाटील यांनी ₹८०,०००/- लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले.
या प्रकरणी भानुदास पुंडलिक मते (वय ४४, सरपंच), समाधान काशिनाथ महाजन (वय ३८, खाजगी इसम) आणि संतोष नथ्थु पाटील (वय ४९, खाजगी इसम) यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून, कारवाई पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या सापळा पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम