
“लायकी प्राप्त होण्यासाठी विनम्रता आवश्यक” – परम पूज्य स्वामी जनार्दन हरिजी महाराज
“लायकी प्राप्त होण्यासाठी विनम्रता आवश्यक” – परम पूज्य स्वामी जनार्दन हरिजी महाराज
धानोरा येथे अखंड ज्योत कीर्तन सप्ताह
धानोरा, ता. चोपडा (प्रतिनिधी) : “देवाला आवाहन करण्यासाठी आधी स्वतःची लायकी सिद्ध करावी लागते. त्यासाठी स्वतःच्या दोषांची जाणीव ठेवावी लागते आणि अहंकाराचा त्याग करावा लागतो. ‘मी काही नाही, मी केवळ तुझा दास आहे’ ही भावना अंगीकारली कीच खरी लायकी प्राप्त होते,” असे मार्गदर्शन परम पूज्य महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांनी केले.
नाथषष्ठी निमित्ताने धानोरा येथे आयोजित अखंड ज्योत कीर्तन सप्ताहाच्या सहाव्या दिवसाच्या प्रवचनात ते बोलत होते. “अधिकार प्राप्त करण्यासाठी किंमत मोजावी लागते. बोलण्यापेक्षा आचरण अधिक महत्त्वाचे आहे. परमार्थ, धर्म आणि सत्य यांचा अवलंब केल्यासच खरे कल्याण होते,” असे ते म्हणाले.
“पैसा कल्याण घडवत नाही, नामस्मरण हाच खरा मार्ग”
स्वामी महाराज पुढे म्हणाले, “पैशाने स्वतःचे किंवा पुढच्या पिढ्यांचेही कल्याण साधता येत नाही. परंतु निस्वार्थपणे सत्कर्मे केली, अहंकार न ठेवता धर्ममार्गाचा अवलंब केला, तर नक्कीच उद्धार होतो. नामस्मरण हाच मोक्षप्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग आहे,” असे त्यांनी सांगितले.
सप्ताहभर चाललेल्या या आध्यात्मिक सोहळ्यात विविध हरिभक्त परायण महाराजांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांना मिळाला. शेवटच्या दिवशी अमृता आश्रमचे स्वामी नवगण राजुरी (जोशी महाराज) यांच्या सुश्राव्य आणि भावपूर्ण कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या अखंड कीर्तन सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष महेश महाजन, भिकारी सोनवणे मोहाडीकर, सतपंथ ज्योत मंदिराचे अध्यक्ष गजानन चौधरी, सावन महाजन, युवराज महाजन, रमेश पाटील, प्रदीप महाजन, बद्रीनारायण व्यास, मुखी कमलाकर चौधरी, मुखी ईश्वर पाटील आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम